वेल्हे: पुणे व रायगड जिल्ह्याच्या सीमेवरील केळद (ता. राजगड) येथील सह्याद्रीच्या उंच डोंगरमाथ्यावर असलेल्या नरवीर तानाजी मालुसरे (मढे) घाट पर्यटनस्थळाचा राजगड वन विभाग आणि स्थानिक ग््राामस्थांच्या पुढाकारातून कायापालट करण्यात आला आहे. पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याबरोबरच परिसरातील दुर्मीळ वनसंपदेचे संवर्धन करण्यावरही भर देण्यात येत आहे.
पावसाळ्यात मढे घाटाच्या माथ्यावरून कोसळणारे धबधबे पाहण्यासाठी राज्यासह देशभरातून लाखो पर्यटक येथे गर्दी करतात. हिवाळ्यातील कडाक्याची थंडी आणि उन्हाळ्यात सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरून वाहणारे थंडगार वारे यामुळे वर्षभर या पर्यटनस्थळावर पर्यटकांची वर्दळ वाढत आहे.
पर्यटकांच्या सुविधेसाठी राजगड वन विभागाने केळद ते मढे घाटमाथा दरम्यान माती-मुरुमाचा रस्ता तयार केला आहे. तसेच स्थानिक ग््राामस्थांनी अंतर्गत मातीचे रस्ते तयार करून दुर्मीळ वृक्ष व वनस्पतींचे जतन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
राजगड वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील लांडगे आणि वन परिमंडळ अधिकारी मंजुषा घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली ऐतिहासिक मढे घाट पर्यटनस्थळाच्या विकासाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. प्रस्तावित कामांसाठी शासनाकडून अद्याप निधी मिळालेला नसला, तरी पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी महिला, मुले, ज्येष्ठ नागरिक यांना सुरक्षितपणे प्रवास करता यावा यासाठी वाहनांसाठी रस्ता तयार करण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आणि सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे व मावळ्यांच्या शौर्याचा जिवंत वारसा या परिसरात आहे. येथे मोठ्या प्रमाणात दुर्मीळ वनसंपदा आहे. तिचे जतन करण्यासाठी स्थानिक युवक एकजुटीने पुढे आले आहेत.रमेश शिंदे, माजी सरपंच, केळद
जिल्ह्यासह राज्यातील सर्वात उंच सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि विस्तीर्ण घाटमाथा या दुर्गम भागात असून, येथे वर्षभर निसर्गाचे विलोभनीय दर्शन घडते. अलीकडच्या काळात पर्यटकांची संख्या चार ते पाच पटीने वाढली असून लोकसहभागातून या पर्यटनस्थळाचा विकास केला जात आहे.सुनील लांडगे, वनपरिक्षेत्र अधिकारी