सासवड : पुढारी वृत्तसेवा
पुरंदर उपासा जलसिंचन योजनेच्या दूषित पाण्यामुळे पुरंदर तालुक्यातील लाभक्षेत्रातील ओढे आणि तलावांजवळील गावांच्या पाणीपुरवठ्याच्या विहिरी, शेतकर्यांच्या विहिरी तसेच बोअरवेलचे पाणी दूषित झाले आहे. यामुळे या भागातील नागरिकांना सर्रास फिल्टर प्लांटमधील जारच्या विकतच्या पाण्याने तहान भागवावी लागत आहे.
पुरंदर उपसा या पूर्वी थकीत वीजबिल आणि दुरुस्ती देखभाल खर्चाअभावी अडचणीत आली होती. या योजनेच्या जलवाहिनी जुन्या आणि मुळा-मुठाच्या रसायनमिश्रित पाण्यामुळे खराब होत आहेत.
पुरंदर तालुक्यातील दिवे, राख-गुळुंचे, पारगाव-माळशिरस अशा जुन्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना अनेक वर्षांपासून बंद आहेत. पुरंदर उपसा जलसिंचन योजनेच्या लाभक्षेत्रातील सर्व पारंपरिक जलस्रोत दूषित झाले असून, येथील प्रादेशिक योजनाही बंद आहेत. केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने 'घर घर में नल से जल' ही घोषणा देत जलजीवन मिशनमधून अंतर्गत अशा सर्व बंद आणि जुन्या पाणीपुरवठा योजनांना नवसंजीवनी मिळणार आहे. काही गावांसाठी निधीही मंजूर झाला आहे. मात्र, ही कामे पूर्ण होतील तेव्हा होतील. सध्या मात्र नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे महत्त्वाचे झाले आहे.