धायरी: मुंबई- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील नऱ्हे- आंबेगाव परिसरातील जांभूळवाडीमधील दरी पुलाजवळ चार वाहनांचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून, बारा जण जखमी झाले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. हृदयनाथ मोहन गायकवाड (वय ४७, रा. जोगेश्वरी पूर्व, मुंबई) आणि आनंदीबाई रामचंद्र वाडकर (वय ५०, रा. नेरुळ, नवी मुंबई) यांचा मृत्यू झाला. तर, जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. ही घटना रविवारी (दि. १३) रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास लक्ष्मी लॉजसमोर घडली.
घटनेची माहिती मिळताच पुणे शहर पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते, उपायुक्त संदीप भाजीभाकरे, आंबेगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शरद झिने यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी, भारती विद्यापीठ, सिंहगड रोड व पीएमआरडीए अग्निशमन दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमींना बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा बाजूकडून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने पुढे चाललेल्या टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेने ही वाहने मुंबईला जाणारी लेन सोडून रस्त्याच्या मध्यभागी असलेले दुभाजक तोडून सातारा बाजूकडे जाणाऱ्या विरुद्ध लेनवर आली. दरम्यान, त्याच वेळी मुंबई बाजूकडून सातारा बाजूकडे जाणाऱ्या दोन मोटारींना या वाहनांनी जोरदार धडक दिली. या अपघातात दोन्ही कारचा चक्काचूर झाला.
हृदयनाथ गायकवाड (वय ४७, रा. मुंबई) आणि आनंदीबाई वाडकर (वय ५०, रा. नेरुळ, नवी मुंबई) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमींवर भारती, मोरया, सिल्व्हर बर्च आणि श्रेयस रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. याप्रकरणी ट्रकचालक प्रमोद विठ्ठल वाघ (वय ४०) आणि ट्रकमालक संदीप गोरख सूर्यवंशी (वय ४५, दोघे रा. खटाव, जि. सातारा) यांच्याविरुद्ध आंबेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ट्रकमालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
महामार्ग प्रशासनाचे अधिकारी आलेच नाहीत
राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात होऊनही महामार्ग प्रशासनाचे कोणीही अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी पोहोचले नाहीत. तसेच, त्यांची अपघातग्रस्त अवजड वाहने बाजूला घेण्यासाठी क्रेनसुद्धा लवकर घटनास्थळी पोहोचली नाही. पोलिस अधिकाऱ्यांनी वारंवार फोन करून सुद्धा त्यांना क्रेनसाठी बराच वेळ ताटकळत बसावे लागले. अखेर अडीच तास होऊन गेल्यानंतर त्यांची क्रेन घटनास्थळी आली. त्यामुळे नागरिक, वाहनचालक यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
नवले पूल, नऱ्हे-आंबेगाव परिसरात सतत मोठे अपघात घडत असतात. अपघात झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाची कोणतीही मदत लवकर उपलब्ध होत नाही. त्यामुळे अपघातातील अनेक जखमींना लवकर उपचार न मिळाल्याने त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. या करिता नवीन कात्रज बोगदा व नवले पूल परिसरात महामार्ग प्रशासनाने चोवीस तास अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी क्रेनसहित सर्व यंत्रणा कार्यरत ठेवावी. अन्यथा, तीव्र आंदोलन करण्यात येईल.सागर भूमकर, माजी उपसरपंच, नऱ्हे