दापोडी : बलभीम भोसले : माझं बाळ गेलं…. माझं बाळ गेलं… प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे व चुकांमुळे नववीत शिकणारा माझा मुलगा अनिकेतचा मृत्यू झाला. माझ्या मुलाचे स्वप्न भंगले.
यानंतर तरी प्रशासनाने लहान बालकाचे जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी इच्छा अपघातात मरण पावलेल्या मुलाचे वडील दीपक शिंदे यांनी व्यक्त केली.
दापोडी परिसरातील प्रमुख रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढल्याने अपघातांच्या प्रमाणात वाढ होत आहे. या अपघाताला आळा घालण्यासाठी मुख्य चौकांमध्ये वाहतूक नियंत्रक दिवे, दुभाजक व गतिरोधक बसविण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
फुगेवाडी, कासारवाडी, दापोडी परिसरातील प्रमुख रस्त्याला जोडणार्या उपरस्त्यावर अनेक छोटे-मोठे चौक निर्माण झाले आहेत. दापोडीतील आंबेडकर चौक, शितळा देवी चौक, तसेच फुगेवाडी गावातील लहान रस्ते या परिसरात अनेक मुख्य चौक आहेत.
अनेक वेळा या चौकात सकाळी व सायंकाळीच्या वेळी वाहतूक कोंडी होते. बहुतांश चौकात प्रमुख रस्त्याच्या कडेला स्वतःची खासगी वाहने उभी करून जास्तीची वाहतूक कोंडीत भर टाकण्याचे काम स्थानिक रहिवासी करीत आहेत.
या गोष्टीकडे वाहतूक विभागाचे दुर्लक्ष होत आहे. संबंधित प्रशासनाने कायमस्वरूपी रस्त्यावर उभे असणार्या वाहनावर कारवाई करणे गरजेचे आहे.
दिवस-रात्रीच्या वेळी भरधाव वेगाने येणारे वाहने चौकात अचानक ब्रेक लावल्यामुळे नित्याने छोटे-मोठे अपघात होतात. यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागले आहेत. तर काही जणांना कायमचे अपंगत्व आले आहे.
त्यामुळे उपरस्त्यावर गतिरोधक बसविणे गरजेचे आहे. मध्यरात्री भरधाव वेगाने वाहणार्या वाहनचालकांना चौक आहे हे पटकन लक्षात येत नाही, त्यामुळे रात्रपाळी करून येणार्या कामगारांचा जीव धोक्यात आला आहे.
त्यासोबतच पहाटे फिरायला व व्यायाम करण्यासाठी बाहेर पडलेले ज्येष्ठ नागरिक, तरुण व्यायाम करीत असतात. तसेच पहाटे, दूध, वर्तमानपत्र टाकणार्या मुलांची काळजी पालकांना लागलेली असते.
चौकांमध्ये गतिरोधक व रस्ता दुभाजक नसल्यामुळे भरधाव वेगान वाहने जातात, त्यामुळे नित्याचे छोटे-मोठे अपघात होतात. यापुढे या चौकात अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.त्वरित वाहतूक विभागाने याबाबत लक्ष घालून समस्या सोडवण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
" संबंधित वाहतूक विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे एका शाळकरी विद्यार्थ्याला जीव गमवावा लागला. या चौकात कुठलेही प्रकारचे वाहतुकीचे नियमांचे पालन होत नसून त्यामुळेच एक शाळकरी विद्यार्थ्यांचा जीव गेला.
ना रस्ता, ना दुभाजक, ना गतिरोधक अशा प्रकारची अवस्था आज या चौकांमध्ये दिसून येत आहे. संबंधित प्रशासनाने या गोष्टीची दखल घेऊन तरी ज्या वाहतुकीचे नियमांचं पालन होईल, या प्रकारचे नियोजन करणे गरजेचे आहे."
– रवी कांबळे, मैत्री संस्था, दापोडी
"मला तीन मुले आहेत. एक मुलगी व दोन मुले त्यातील एक मुलगा अनिकेत हा इयत्ता नववीत सांगवीच्या नृसिंग हायस्कूलमध्ये शिकणारा त्याचा अपघातामध्ये मृत्यू झाला.
"प्रशासनाने यापुढे अशा शाळकरी विद्यार्थ्यांचे मुलांचे मृत्यू होणार नाहीत. यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आमचे संपूर्ण स्वप्न भंगले आहे. आतापर्यंत तीन-चार जणांचा जीव अशा घटनेमध्ये गेला आहे. प्रशासनाने या गोष्टीची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे."
-दीपक शिंदे, दापोडी.