पुणे: महापालिकेत जनतेच्या कराच्या पैशांची उघडपणे उधळपट्टी होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गेल्या दोन महिन्यांत महापालिकेच्या विविध कार्यालयांची वीजबिले तब्बल 25 टक्क्यांनी वाढल्यानंतर अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी वीजबचतीसाठी कडक आदेश बुधवारी जारी केले होते. मात्र, हे आदेश लागू होण्याआधीच महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी यांनी त्यालाच हरताळ फासल्याचे चित्र गुरुवारी समोर आले.
महापालिका मुख्य इमारतीतील अनेक विभागांची पाहणी केली असता धक्कादायक प्रकार उघडकीस आले. अनेक कार्यालये आणि केबिन पूर्णपणे रिकामी असतानाही दिवे, पंखे आणि वातानुकूलित यंत्रणा (एसी) तासन्तास सुरू असल्याचे दिसून आले. अधिकारी जागेवर नसताना सरकारी विजेचा बेदरकार वापर सुरू असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
वीजबचतीसाठी अतिरिक्त आयुक्तांचे कडक आदेश
वाढत्या वीजबिलांच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी नुकतेच सर्व विभागांना कठोर सूचना दिल्या होत्या. राज्य शासनाच्या निर्देशानुसार कार्यालयांतील एसीचे तापमान 24 ते 26 अंश सेल्सिअसदरम्यान ठेवणे बंधनकारक करण्यात आले होते. तसेच कार्यालयांमध्ये चहा, कॉफी किंवा जेवण गरम करण्यासाठी वापरले जाणारे इलेक्ट्रिक स्टोव्ह तातडीने बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते.
कार्यालय बंद करताना सर्व विद्युत उपकरणे बंद आहेत की नाही, याची खात्री करण्यासाठी प्रत्येक विभागात स्वतंत्र समन्वयक नियुक्त करण्याचेही निर्देश देण्यात आले होते. या आदेशात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर दंडात्मक, तसेच शिस्तभंगाची कारवाई करण्याचा स्पष्ट इशाराही देण्यात आला होता.
आदेशांची उघडपणे पायमल्ली
आदेश जारी झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच त्याची पायमल्ली होत असल्याचे दिसून आले. महापालिकेच्या भूसंपादन विभागात अधिकारी अनुपस्थित असतानाही एसी, पंखे आणि दिवे सुरूच होते. संपूर्ण कार्यालय ओस पडलेले असतानाही सरकारी विजेचा वापर सुरू असल्याचे आढळले. मालमत्ता व्यवस्थापन विभागातही हाच प्रकार दिसून आला.
रिकाम्या केबिनमध्ये एसी सुरू ठेवण्यात आले होते. काही ठिकाणी कर्मचारी उपस्थित नसतानाही दिवे आणि अन्य उपकरणे चालू होती. महापालिकेतील वरिष्ठ अधिकारीच नियमांकडे दुर्लक्ष करत असतील, तर इतर कर्मचाऱ्यांकडून शिस्तीची अपेक्षा कशी करायची, असा सवाल उपस्थित केला जात आहे.