पौड: राज्य सरकारच्या माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत उच्चतम कामगिरी केल्याबद्दल मुळशी पंचायत समितीचा पुणे जिल्ह्यात प्रथम क्रमांक आला. माझी वसुंधरा अभियान 1 जून 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीत राबविण्यात आले. राज्यातील 422 नागरी स्थानिक संस्था आणि 27,895 ग््राामपंचायतींनी त्यात सहभाग घेतला.
गटविकास अधिकारी सुधीर भागवत, सहाय्यक गटविकास अधिकारी दत्तात्रेय भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी आणि ग््राामविकास अधिकारी, गावकारभारी यांनी विविध उपक्रम यशस्वीपणे राबविले. नियोजनबद्ध अंमलबजावणी, वेळेत कामांची पूर्तता, ग््राामपातळीवरील सक्रिय सहभाग आणि प्रशासन-जनतेतील समन्वय यामुळे मुळशीने जिल्ह्यात अव्वलस्थान पटकावले.
मुळशी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुधीर भागवत, सहाय्यक गटविकास अधिकारी दत्तात्रेय भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीचे विविध विस्तार अधिकारी, ग््राामपंचायतींचे ग््राामविकास अधिकारी, सरपंच, उपसरपंच आणि सदस्य यांनी वसुंधरा अभियानांतर्गंत राज्य सरकारने ठरवून दिलेली कामे पूर्ण केली.
विविध उपक्रमांची अंमलबजावणी
भागवत यांनी या कामांचा गावोगाव जाऊन पाठपुरावा केला. त्यामध्ये जैवविविधता संरक्षण, रोपवाटिका विकास, हरित आच्छादन वाढ, वृक्ष गणना व जिओ-टॅगिंग, पुरातन वृक्षसंवर्धन, बीज संकलन केंद्र स्थापना, जलसंवर्धन, नाल्यांची साफसफाई, जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजना, नदी, तलाव पुनरुज्जीवन, पाणवठे व पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था, प्लास्टिकबंदी, कापडी पिशव्यांचे वाटप, स्वच्छता अभियान, वायूप्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या. शाळांमध्ये जनजागृती केली. महिलांना भाजीपाला बियाणे वाटप केले. गावांमध्ये रानभाज्या महोत्सव राबविला गेला. सौर पथदिवे, घनकचरा व्यवस्थापन, डस्टबिन वाटप केले गेले. गणेशोत्सव, होळी, दीपावली हे सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे केले. पंचायत समितीने वर्षभरात केलेल्या विविध उपक्रमांचे राज्य सरकारच्या त्रयस्थ यंत्रणेमार्फत मूल्यमापन करण्यात आले. त्यात जिल्ह्यात मुळशी पंचायत समितीला प्रथम क्रमांक जाहीर केला.
मुळशी तालुक्याला जिल्ह्यात मिळालेला प्रथम क्रमांकाचा हा सन्मान पर्यावरविषयक बांधिलकीचे द्योतक आहे. भविष्यातही हरित आणि स्वच्छ मुळशीसाठी पंचायत समिती नेहमीच पुढाकार घेईन.सुधीर भागवत, गटविकास अधिकारी, मुळशी.