पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीने गट-ब आणि गट-क च्या पूर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याची घोषणा केली आहे. यावरून स्पर्धा परीक्षार्थी आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे या निर्णयावरून होणाऱ्या राजकारणावर आणि आंदोलनांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत खासगी क्लासचालकांनी स्पर्धा परीक्षार्थ्यांचा वापर करून आंदोलने भडकवू नयेत, असा सज्जड दम दिला आहे.
सारथी संस्थेच्या वतीने आयोजित 'यूपीएससी, एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांमधील 'यशस्वी विद्यार्थी व पालकांचा सन्मान सोहळा' या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. एमपीएससीने संबंधित परीक्षा ऑनलाईन घेण्याची घोषणा केल्यामुळे काही तरुणांमध्ये अस्वस्थता आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, याची मला कल्पना आहे. मी विद्यार्थ्यांना आश्वस्त करू इच्छितो की, यामध्ये कोणताही निर्णय एकतर्फी किंवा विद्यार्थ्यांवर लादला जाणार नाही. आपण सर्व घटकांशी, विशेषतः विद्यार्थ्यांशी सविस्तर चर्चा करूनच पुढील पाऊल उचलू. एमपीएससीमध्ये अनेक मोठे आणि सकारात्मक बदल करायचे आहेत, ते सर्व संवाद साधूनच केले जातील.
परंतु, अनेक वेळा कोचिंग क्लासवाले स्वतःचा व्यावसायिक सेटअप डिस्टर्ब होतो किंवा आर्थिक नुकसान होते म्हणून विद्यार्थ्यांना पुढे करून आंदोलने उभी करतात. हे अत्यंत चुकीचे आणि निषेधार्ह असल्याचे फडणवीस म्हणाले. स्पर्धा परीक्षांची प्रामाणिकपणे तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आपल्या फायद्यासाठी वापर करणे कोणीही खपवून घेणार नाही. क्लासचालकांचे काम फक्त विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करणे आणि मार्गदर्शन करणे आहे, त्यांनी तेवढंच करावे असे देखील फडणवीस यांनी स्पष्ट केले.
नव्या बदलानुसार, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्वपरीक्षा, महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा या तिन्ही महत्त्वाच्या परीक्षा आता वर्षातून केवळ एकदाच न होता, दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा घेतल्या जाणार आहेत. हा महत्त्वपूर्ण बदल सन २०२७ च्या पूर्व परीक्षांपासून संपूर्ण राज्यात लागू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
एमपीएससीचे केले कौतुक
फडणवीस म्हणाले, मी एमपीएससीच्या अध्यक्षांचे आणि संपूर्ण टीमचे मनापासून अभिनंदन करतो. त्यांनी केवळ २१ दिवसांच्या विक्रमी वेळेत परीक्षा घेऊन तिचा निकाल जाहीर केला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेत कुठेही कोणतीही गडबड किंवा गोंधळ झालेला नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा वेळेत झाल्या पाहिजेत, ही आमची भूमिका आहे. परीक्षा जितक्या नियमित होतील, तितकी जास्तीत जास्त मुलांना संधी मिळेल. अत्यंत पारदर्शीपणे या परीक्षा पार पडणे काळाची गरज आहे.