पुणे: पर्वती परिसरातील जनता वसाहतीमधील सोळावर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्या रिजवान इक्राबद्दीन अन्सारी (वय 35, रा. उत्तमनगर), दशरथ आत्माराम चव्हाण (वय 22, वडगाव बुद्रुक) यांना न्यायालयाने वीस वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
तर, पीडितेच्या अपहरण केल्याच्या कलमानुसार तिची मैत्रीण उज्ज्वला रवींद्र आतकरे (वय 23, सिंहगड रोड) आणि साजिद बुंदू अन्सारी (वय 26, रा. एरंडवणा) या दोघांना दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. वाघमारे यांनी हा निकाल दिला. (Latest Pune News)
उज्ज्वला ही पीडितेची मैत्रीण आहे. ही घटना 29 व 30 ऑगस्ट 2018 दरम्यान जनता वसाहत, वडगाव बुद्रुक येथे घरी तसेच भूगाव येथील लॉजवर घडली. घटनेच्या दिवशी पीडिता रस्त्याने चालली असताना हातातून मोबाईल पडला. त्यावरून वाहन गेल्याने तो खराब झाला. घरचे रागावतील म्हणून ती मैत्रीण उज्ज्वलाकडे गेली.
त्यावेळी उज्ज्वलाने आपल्या दोन मित्रास घरी बोलावले, त्यापैकी दशरथ याच्यासोबत पीडितेला जबरदस्तीने शरीरसंबंध प्रस्थापित करण्यास भाग पाडले. त्यानंतर मोबाईल दुरुस्तीसाठी तळेगावला जावे लागेल, असे सांगितले. पीडितेने घाबरून त्यास नकार दिला. मात्र, घडलेली घटना घरी सांगेन, असे धमकावून रिक्षा बोलावली.
त्यामध्ये रिजवान आणि साजिद होते. ते रिक्षामधून भूगावमधील एका लॉजवर घेऊन गेले. तिथे रिजवानने तिच्यावर बलात्कार केला. तिने विरोध केला असता रिजवानने मारहाणही केली, तर साजिद आणि उज्ज्वलाने धमकाविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेनंतर पीडितेला सिंहगड रस्ता येथील राजाराम पूल येथे सोडून सर्वजण निघून गेले. त्यानंतर पीडितेने दत्तवाडी पोलिसात फिर्याद दिली.
या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील मारुती वाडेकर यांनी काम पाहिले. अॅड. वाडेकर यांच्या युक्तिवादानुसार न्यायालयाने अत्याचार करणार्या दोघांना 20 वर्षे सक्तमजुरी आणि अन्य दोघांना दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. याखेरीज रिजवान याला 13 हजार 500 रुपये, दशरथ याला 10 हजार रुपये, उज्ज्वला हिला सात हजार 500 आणि साजिदला तीन हजार रुपये दंडही ठोठावला.