निरा: आषाढीवारीवरून माउलींचा पालखी सोहळा आळंदीकडे परतीच्या प्रवासाला निघाला आहे. माउलींचे परतीच्या प्रवासात पुणे जिल्ह्यातील निरा येथे सोमवारी (दि. ३) सकाळी ९.१० वाजता रिमझिम पावसात स्वागत झाले. त्या अगोदर दत्तघाटावर माउलींच्या पादुकांना माउली माउलींच्या जयघोषात निरास्नान घालण्यात आले.
रविवारी (दि. २) पाडेगाव (ता. फलटण) येथील मुक्काम आटोपून पालखी सोहळा सोमवारी सकाळी आठ वाजता पुणे जिल्ह्यातील निरा नगरीकडे मार्गस्थ झाला. सकाळी पावणेनऊ वाजता सोहळा निरा नदीच्या दत्तघाटासमोर थांबला. माउलींच्या पादुकांना खळखळून वाहणाऱ्या निरामाईच्या पवित्र तीर्थाने पालखी सोहळा मालक राजेंद्र पवार-आरफळकर, आळंदी संस्थानचे प्रमुख विश्वस्त अॅड. राजेंद्र उमाप यांच्या हस्ते स्नान घालण्यात आले.
ब्रिटीशकालीन पुलावर रथापुढील व रथामागे रांगेत उभे असलेल्या विणेकऱ्यांना सोहळा मालकांनी माउलींचे निरास्नान झाल्यानंतर पादुकांचे स्पर्श दर्शन दिल्याचे आळंदी संस्थानचे प्रमुख विश्वस्त अॅड. राजेंद्र उमाप यांनी सांगितले. निरास्नानानंतर माउलींचा रथ निरा नगरीकडे मार्गस्थ झाला. उपसरपंच राजेश काकडे, निरा पोलिस दूरक्षेत्राचे हवालदार संतोष मदने, नीलेश करे यांच्यासह ग्रामस्थांनी माउलींचे स्वागत केले.
सोहळा निरा गावात मार्गस्थ होत असताना रिमझिम पावसाच्या सरींनी देखील माउलींचे जोरदार स्वागत केले. सोहळा अहिल्यादेवी चौकात आल्यानंतर तरुणांनी माउलींची पालखी दुपारच्या विसाव्यासाठी विठ्ठल मंदिरात ठेवली. या वेळी असंख्य भाविकांनी माउलींच्या पादुकांचे दर्शन घेतले.
या वेळी सोमेश्वर सह. साखर कारखान्याच्या वतीने सोहळ्यातील वारकऱ्यांना अन्नदान करण्यात आले. सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांचा आळंदी संस्थानचे प्रमुख विश्वस्त अॅड. राजेंद्र उमाप यांनी सत्कार केला. या वेळी विश्वस्त मदन चव्हाण, प्रमोद गवळी, संतोष गांधी उपस्थित होते. दुपारी दीड वाजता सोहळा वाल्हे मुक्कामी मार्गस्थ झाला.