Sugar Factory Pudhari
पुणे

Malegaon Sugar Factory CBG Project: माळेगाव साखर कारखान्याची ‘सीबीजी’कडे झेप; ७५ कोटींच्या प्रकल्पातून शाश्वत ऊर्जानिर्मितीला बळ

१५ टीपीडी क्षमतेचा प्रकल्प; प्रेसमड, पाचट व शेणापासून कॉम्प्रेस्ड बायोगॅस निर्मिती, शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होण्याची अपेक्षा

पुढारी वृत्तसेवा

प्रा. अनिल धुमाळ

शिवनगर: सहकारी साखर उद्योगात अग्रगण्य असलेल्या बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याने केवळ साखर उत्पादन, सहवीज आणि इथेनॉलच्या निर्मितीपुरते मर्यादित न राहता ऊर्जेच्या शाश्वत पर्यायांकडे पाऊल टाकले आहे. कारखान्याच्या अध्यक्षा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पुढाकाराने १५ टीपीडी क्षमतेचा ७५ कोटी रुपयांचा कॉम्प्रेस्ड बायोगॅस(सीबीजी) प्रकल्प उभारला जात आहे.

केंद्र सरकारच्या 'गोबरधन' योजनेअंतर्गत कारखान्याने प्रस्तावित केलेला कॉम्प्रेस्ड बायोगॅस (सीबीजी) प्रकल्प साखर उद्योगाच्या भविष्यातील वाटचालीसाठी मैलाचा दगड ठरणार आहे.केंद्र सरकारने सुमारे २३,७३१ कोटी रुपयांच्या बजेटसह 'गोबरधन' योजनेला दिलेली मान्यता आणि त्यास जोडलेली 'सीबीजी' प्रकल्पांची साखळी ही केवळ माळेगाव कारखान्यासाठीच नव्हे, तर सहकारी साखर कारखानदारीसाठी नवी दिशा देणारी आहे.

केंद्र शासनाच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयामार्फत राबविल्या जाणाऱ्या या योजनेत साखर कारखान्यांतून निघणारे प्रेसमड, शेतीतील पिकांचे अवशेष (बगॅस/पाचट) आणि गुरांच्या शेणापासून सीबीजीनिर्मितीला प्रोत्साहन दिले जात आहे. नव्या तसेच विस्तारणाऱ्या प्रकल्पांसाठी क्षमतेनुसार प्रतिटन २ कोटी रुपयांपर्यंतचे भांडवली साहाय्य सरकारकडून उपलब्ध होणार आहे. तसेच, उत्पादित सीबीजीसाठी प्रति एमएमबीटीयू २,११० रुपये असा स्थिर आणि आकर्षक दर निश्चित करण्यात आला आहे.

साखरनिर्मिती प्रक्रियेत तयार होणाऱ्या प्रेसमडची योग्य विल्हेवाट लावणे, हे कारखान्यांसमोर आव्हान असते. मात्र, सीबीजी प्रकल्पामुळे या टाकाऊ घटकाचे ''सोन्यात'' रूपांतर होणार आहे. साखर, इथेनॉल तसेच सह वीजनिर्मितीव्यतिरिक्त सीबीजीच्या विक्रीतून मिळणाऱ्या अतिरिक्त उत्पन्नामुळे माळेगाव कारखान्याची आर्थिक स्थिती भक्कम होईल. परिणामी, भविष्यात ऊस उत्पादकांना एफआरपीपेक्षा अधिकचा दर देणे कारखान्याला शक्य होणार आहे.

महाराष्ट्रातील बहुतांश सहकारी साखर कारखाने सध्या केवळ साखर उत्पादन आणि इथेनॉलवर अवलंबून आहेत. परंतु, साखरेचे आंतरराष्ट्रीय दर आणि इथेनॉलनिर्मितीवरील सरकारी धोरणांतील बदलांमुळे कारखान्यांचे गणित बिघडू शकते.थोडक्यात, माळेगाव साखर कारखान्याने 'गोबरधन' योजनेअंतर्गत सीबीजी प्रकल्पाची धरलेली वाट ही केवळ पर्यावरणाचे रक्षण करणारी नसून, कारखान्याला आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक समृद्धी आणणारी असल्याचे मत कारखानदारातील तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.

दिवंगत उपमुख्यमंत्री तथा माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या दूरदृष्टीमुळेच माळेगाव कारखान्यात सीबीजी प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली गेली. कारखान्याला केवळ पारंपारिक साखर उत्पादनापुरते मर्यादित न ठेवता उपपदार्थांच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचा आणि पर्यावरणाचा समतोल राखण्याचा विचार त्यांनी वेळोवेळी मांडला होता. या विचारानुसारच उपमुख्यमंत्री तसेच माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार या सीबीजी प्रकल्प लवकरात लवकर प्रत्यक्ष कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
योगेश जगताप, संचालक, माळेगाव साखर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT