महाराष्ट्रात पुन्हा महायुतीची सत्ता येईल - चंद्रकांत पाटील Chandrakant Patil
पुणे

Maharashtra Assembly Polls: महाराष्ट्रात पुन्हा महायुतीची सत्ता येईल - चंद्रकांत पाटील

Maharashtra Politics: महाराष्ट्रात पुन्हा महायुतीची सत्ता येईल, असा विश्वास राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री व कोथरूडचे भाजप उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

पुढारी वृत्तसेवा

Pune News: विधानसभा निवडणुकीत पुणे (Pune) जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्र महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्यामुळे महायुतीमधील घटकपक्षांचे पदाधिकारी, नेते एकदिलाने आणि समन्वयाने काम करतील आणि महाराष्ट्रात पुन्हा महायुतीची सत्ता येईल, असा विश्वास राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री व कोथरूडचे भाजप उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

विधानसभा निवडणुकीच्या नियोजनासाठी सोमवारी कोथरूडमध्ये महायुतीतील घटकपक्षांच्या शहर व जिल्ह्यातील नेते आणि पदाधिकार्‍यांची बैठक झाली. या बैठकीला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, आमदार राहुल कुल, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, ग्रामीणचे अध्यक्ष शरद बुट्टे पाटील, वासुदेव काळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, शहराध्यक्ष दीपक मानकर, शिवसेनेचे किरण साळी, रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाचे संजय सोनावणे, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे उपस्थित होते. (Latest Chandrakant Patil News)

बैठकीनंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, विधानसभा निवडणूक आणि सत्तास्थापनेत पश्चिम महाराष्ट्र महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील 58 पैकी 45 जागा महायुतीकडे आहेत.

या जागा राखल्या तरी आपली सत्ता येऊ शकते. लोकसभेत या भागात 3 ते 21 हजार मतांच्या फरकाने आपण काही जागा गमावल्या. यातील प्रत्येक बूथवर काही अधिक मते मिळाली असती, तर महायुतीला या जागा मिळाल्या असत्या. त्यामुळे विधानसभेसाठी बूथपातळीवर काम करून, यादीवाचन करून योग्य नियोजन करण्याविषयी बैठकीत सूचना देण्यात आल्या, असे पाटील म्हणाले.

जरांगेंनी सांगावे, आमची काय चूक झाली?

मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आरक्षण दिले, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ते घालविले, पुन्हा एकनाथ शिंदे यांनी आरक्षण दिले. मग आमची काय चूक झाली? हे मनोज जरांगे यांनी सांगावे. मराठा आरक्षणासाठी केलेल्या कामाची जरांगे यांनी दखल घेतली नाही, तरी समाज दखल घेईल. जरांगे पाचशे रुपयांच्या स्टॅम्पवर लिहून मागतात, आम्ही एक हजाराच्या स्टॅम्पवर लिहून देऊ की आम्ही एसईबीसी आरक्षण टिकवून दाखवू, असे देखील चंद्रकांत पाटील म्हणाले.

मुरलीधर काय म्हणाले?

मुरलीधर मोहोळ म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी महायुती सज्ज आहे. विधानसभा निवडणुकीसाठीचे नियोजन सुरू आहे. केंद्रातील एनडीएचे सरकार आणि राज्यातील महायुतीच्या सरकारच्या कामगिरीच्या आधारे मतदार पुन्हा महायुतीलाच संधी देतील. भाजपने ठरविलेल्या निकषांनुसार उमेदवार जाहीर केले जात आहेत.

पहिल्या यादीत जाहीर न झालेल्या मतदारसंघांतील उमेदवार पुढील यादीत जाहीर होतील. कार्यकर्त्यांनी उमेदवारीची अपेक्षा बागळण्यात काहीच गैर नाही. मात्र, पक्ष देईल त्या उमेदवाराचे काम सर्व जण करतील. एकदा निर्णय झाला की कोणी नाराज राहणार नाही. उमेदवाराचा अर्ज भरताना सर्वजण सोबत दिसतील, असेही मोहोळ म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT