नागपूर : भाजपची दुसरी आणि तिसरी यादी लवकरच येणार आहे. प्रभावशाली उमेदवार देणे हे जिंकण्यासाठी पक्षाचे सूत्र आहे. त्या अनुषंगाने महायुतीत अजूनही चर्चा सुरू असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी येथे दिली. (Maharashtra Assembly Polls | Chandrasekhar Bawankule)
उमेदवाराची निवड करताना जिंकण्याचे गणित महत्त्वाचे असते. कधी थांबावे लागते, तर कधी संघटनेची जबाबदारी सांभाळावी लागते. परिस्थितीनुसार अनुकूल निर्णय घ्यावे लागतात, असेही कामठीच्या उमेदवारीवरून एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले. नागपूर जिल्ह्यातील उमरेड ही जागा परंपरागत भाजपची आहे. त्यामुळे ती भाजपकडे राहील. महायुतीच्या उमेदवारांचे चेहरे समोर येतील तेव्हा जनता महायुतीला मतदान करेल, असा दावा त्यांनी केला.
भाजपमधील नाराजीबाबत ते म्हणाले, आतापर्यंत 99 जागांवरील उमेदवार जाहीर झाले आहेत. काही ठिकाणी चार-पाच उमेदवार इच्छुक असतात. एका पदावर एकच व्यक्तीला संधी मिळू शकते. थोडी नाराजी असणार आहे. पुढील यादी प्रभावी चेहर्याची असेल. महाविकास आघाडीत वाद सुरू आहेत; तर महायुतीकडे विकासाचा अजेंडा आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सामाजिक आंदोलन उभे केले आहे. त्यांना वाटते जर त्यांचे आमदार निवडून आले तर समाजाचे प्रश्न सुटतील. लोकशाहीत सर्वांनाच निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. (Maharashtra Assembly Polls | Chandrasekhar Bawankule)