पुणे: महाराष्ट्रातून तब्बल ७ लाख ११ हजार ५६२ नागरिकांचे मोबाईल चोरीला गेले आहेत. त्यापैकी सुमारे ४ लाख १३ हजार ९१ हँडसेटचा शोध लागला. त्यापैकी १ लाख ६८ हजार ७०१ मोबाईल प्रत्यक्षात नागरिकांना परत देण्यात आले आहेत. डिपार्टमेट ऑफ टेलिकॉम ची (डीओटी) ही कामगिरी आहे.
भारतासारखा महाकाय खंडप्राय देश १४० कोटी लोकसंख्या आहे. यापैकी सुमारे ११५ कोटी लोकांकडे मोबाईल आहे. त्यातील सुमारे ६६ कोटी लोक स्मार्टफोन वापरतात. देशात दररोज पंधराशे ते दोन हजार तर महिन्याला तब्बल ५० हजार मोबाईल हरवतात किंवा चोरीला जातात. त्यासाठी १६ मे २०२३ रोजी संचार साथी संकेतस्थळ सरकारने निर्माण केले.
तर १७ जानेवारी २०२५ रोजी संचार साथी नावाने ॲप सुरू केले. मोबाईल हरवला की यावर तक्रार नोंदवली की, सरकारी पातळीवर याची दाखल घेऊन तो शोधून दिला जातो. अवघ्या दीड वर्षात या ॲपने कमाल केली असून, देशातील लाखो नागरिकांचे हरवलेले मोबाईल शोधून दिले आहेत.
ब्रिक्स परिषदेचे सदस्य भारावले..
पुणे शहरात पाच दिवसांपूर्वी ब्रिक्स राष्ट्रांची परिषद झाली. यात सात दशांचे प्रतिनिधी आले होते. यात देशात किती मोबाईलधारक आहेत. स्मार्टफोन किती लोक वापरतात. तसेच, हरवलेले मोबाईल किती वेगवान पद्धतीने सरकार शोधून देते याची आकडेवारी केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी सादर केली. तेव्हा ब्रिक्स परिषदेत सहभागी झालेले सदस्य भारावून गेले.
देशातील आकडेवारी...
ब्लॉक केलेले मोबाईल : ५८ लाख ४२ हजार ६९०
सापडलेले (ट्रेस ) मोबाईल : ३६ लाख ३६ हजार १४१
प्रत्यक्षात ताब्यात आले : १३ लाख १६ हजार ७२५
शोधून देण्याची टक्केवारी : ३६.२१ %
महाराष्ट्राची आकडेवारी...
ब्लॉक केलेले मोबाईल : ७ लाक ११ हजार ५६२
सापडलेले मोबाईल : ४ लाख १३ हजार ९१
प्रत्यक्षात ताब्यात आले : १ लाख ६८ हजार ७०१
शोधून देण्याची टक्केवारी ४०.८४ %