SSC HSC Board Pudhari
पुणे

Maharashtra SSC HSC Supplementary Result: दहावी-बारावी पुरवणी निकालात घसरण; दहावीचा 29.53%, बारावीचा 38.72% निकाल जाहीर

दहावीत 15,157 तर बारावीत 39,518 विद्यार्थी उत्तीर्ण; गुणपडताळणी, पुनर्मूल्यांकनासाठी 15 जुलैपासून ऑनलाइन अर्ज

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर केला. यामध्ये दहावीचा २९.५३ टक्के, तर बारावीचा निकाल ३८.७२ टक्के लागला. दहावीचे १५ हजार १५७ तर बारावीचे ३९ हजार ५१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गेल्यावर्षीची तुलना करता यंदा दहावीच्या निकालात ६.९६ टक्क्यांनी घट तर बारावीच्या निकालात ४.९३ टक्के घट झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी, सचिव डॉ. दीपक माळी यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे निकालाचा तपशील जाहीर केला. गेल्या वर्षी दहावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल ३६.४८ टक्के लागला होता. त्यामुळे यंदा निकालात ६.९६ टक्क्यांनी घट झाली आहे. दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी ५२ हजार ८८० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यात ३७ हजार ९२४ मुले तर १४ हजार ९५६ मुली होत्या. प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी १० हजार २२४ मुले आणि ४ हजार ९३३ मुली उत्तीर्ण झाल्या. दहावीच्या परीक्षेत १८ हजार ४८२ विद्यार्थी एक किंवा दोन विषयांत उत्तीर्ण होऊ न शकल्याने ते एटीकेटीसाठी पात्र ठरले आहेत. या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये एटीकेटी सवलतीद्वारे अकरावीला प्रवेश घेता येणार आहे.

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी १ लाख ३ हजार ६४२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यात कला शाखेचे ३१ हजार ९६०, विज्ञान शाखेचे ४१ हजार ५४१, वाणिज्य शाखेचे २७ हजार ६९५, उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाचे (एमसीव्हीसी) २ हजार १४०, आयटीआयच्या ३०६ विद्यार्थ्यांचा समावेश होता. १ लाख २ हजार ५० विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली होती. त्यापैकी ३९ हजार ५१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेचा २६ हजार ४ (६४.९५ टक्के), कला शाखेचे ६ हजार ८३४ (२१.४० टक्के), वाणिज्य शाखेचे ६ हजार १९५ (२२.४० टक्के), एमसीव्हीसीचे ३९२ (१८.३४ टक्के), आयटीआयचे ९३ (३४.४९ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गेल्यावर्षी बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल ४३.६५ टक्के लागला होता. त्यामुळे यंदा निकालात ४.९३ टक्के घट झाली आहे.

दहावीच्या पुरवणी परीक्षेत नाशिक विभागाचा निकाल सर्वांधिक ४१.४५ टक्के लागला. त्या खालोखाल नागपूर विभागाचा ३९.४२ टक्के, लातूर विभागाचा ३४.५५ टक्के निकाल लागला. तर कोकण विभागाचा निकाल सर्वांत कमी १२.२६ टक्के लागला आहे. बारावीच्या परीक्षेत छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वाधिक ५२.९० टक्के लागला. त्या खालोखाल लातूर विभागाचा ४६.५३ टक्के निकाल लागला. तर कोकण विभागाचा निकाल सर्वांत कमी, २०.९० टक्के लागला.

गुणपडताळणी, पुनर्मूल्यांकन, छायाप्रतीसाठी आजपासून करता येणार अर्ज गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने https://www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना स्वतः अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी १५ ते २४ जुलै या कालावधीत ऑनलाइन अर्ज आणि शुल्क भरता येणार आहे. पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आधी छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून त्या पुढील पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनासाठी शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक राहील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT