पुणे: घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे जे विद्यार्थी शाळेत जाऊ शकत नाहीत, नियमित शिक्षण घेऊ शकत नाहीत अथवा शिक्षण अर्धवट राहिले आहे. अशा विद्यार्थ्यांना मार्च २०२७ च्या दहावी-बारावी परीक्षेसाठी १७ नंबरचा अर्ज भरता येणार आहे. त्यासाठी १ ऑगस्ट ते ३० सप्टेंबरदरम्यान नियमित शुल्कासह, १ ते १५ ऑक्टोबर दरम्यान विलंब शुल्कासह, तर १६ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान अतिविलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी खासगी विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याची संधी दिली असल्याचे स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला मूळ प्रत, नसल्यास द्वितीय प्रत व प्रतिज्ञापत्र, आधारकार्ड, स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो ही कागदपत्रे आवश्यक असल्याचे सांगण्यात आलेे. दहावी आणि बारावीसाठी नोंदणी शुल्क १११० रुपये, प्रक्रिया शुल्क १०० रुपये, तसेच विलंब शुल्क १०० रुपये आहे.
विद्यार्थ्यांनी नावनोंदणी अर्ज व नियमित शुल्क ऑनलाइन भरून अर्जाची प्रिंटआउट, ऑनलाइन नावनोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावतीची प्रिंटआउट व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या शाळेत किंवा कनिष्ठ महाविद्यालयात दिलेल्या मुदतीत जमा करावी लागणार आहे.
...असा करा अर्ज
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अधिकृत संकेतस्थळ http:///www.mahahsscboard.in वर ऑनलाइन नोंदणी करा. त्यापूर्वी ज्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातून परीक्षा द्यायची आहे.
त्या शाळा अथवा कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन त्यांचा सांकेतिक क्रमांक, विषय योजना, माध्यम, शाखा व इतर आवश्यक माहिती घ्या. संकेतस्थळावरील स्टुडंट कॉर्नरवरील सूचनांची अंमलबजावणी करा. सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅनर, मोबाइलद्वारे पीडीएफ काढून अपलोड करा. दिलेल्या पत्त्यानुसार जिल्हा, तालुका निवडलेल्या माध्यमानुसार येणाऱ्या शाळांच्या यादीतून एका शाळेची निवड करा.