पुणे: मान्सून काळात राज्यातील सर्व शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत शाळांच्या इमारती, वर्गखोल्या, स्वयंपाकगृहे आणि स्वच्छतागृहांची नियमित तपासणी करणे तसेच राज्यातील शाळेतील धोकादायक वर्गखोल्या तत्काळ बंद करा, असे निर्देश महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक संजय यादव यांनी दिले आहेत.
शाळेचे छत, भिंती किंवा व्हरांड्यातून पाणी गळत असल्यास त्या भागात विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नये. इमारतीला भेगा, खचणे किंवा इतर संरचनात्मक नुकसान आढळल्यास संबंधित अभियंत्याकडून तपासणी झाल्यानंतरच त्या भागाचा वापर करावा. धोकादायक इमारती किंवा वर्गखोल्या तत्काळ बंद करून परिसराला कुंपण घालावे आणि अतिधोकादायक इमारती नियमानुसार पाडण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश यांनी दिले आहेत.
शाळेतील विद्युत यंत्रणा, स्विच, तारा, पंप आणि इतर उपकरणांची सुरक्षितता तपासण्यास सांगण्यात आले असून, वीज कडाडत असताना विद्यार्थ्यांना मैदानात, झाडाखाली किंवा ध्वजस्तंभा जवळ जाण्यास मनाई केली आहे. अतिवृष्टी किंवा वादळी वाऱ्याच्या वेळी विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचेही निर्देश आहेत.
परिसरातील धोकादायक झाडे, तुटलेल्या फांद्या, पडलेले खांब त्वरित हटविणे, पाणी साचू न देणे, गटारे स्वच्छ ठेवणे, पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासणे, स्वच्छतागृहांची स्वच्छता राखणे आणि परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यावरही भर देण्यात आला आहे.
तसेच प्रथमोपचार पेटी अद्ययावत ठेवणे, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करणे, विहिरींना मजबूत लोखंडी जाळी बसविणे, संरक्षक भिंत व मुख्य प्रवेशद्वाराची पाहणी करणे आणि ज्या शाळांमध्ये संरक्षक भिंत नाही तेथे हरित कुंपण उभारण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. सर्व महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका प्रशासनाला तातडीने आवश्यक उपाययोजना करण्यासंदर्भात सूचित केले आहे.