पुणे: महाराष्ट्र साहित्य परिषदेची 2026 ते 2031 साठीची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. टपालाने (पोस्ट) मतपत्रिका न मिळालेल्या मसापच्या आजीव सभासदांना दुबार मतदान प्रक्रियेमध्ये मतदान करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली असून, बुधवारी (दि.4) पहिल्या दिवशी 53 सभासदांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
मतपत्रिका न मिळालेल्या सभासदांना शुक्रवारपर्यंत (दि. 6 मार्च) महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून मतदान करण्याची संधी मिळणार आहे. शुक्रवारनंतर मतदानासंदर्भात कोणत्याही प्रकारचा विनंती अर्ज स्वीकारला जाणार नाही, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी ॲड. प्रताप परदेशी, सहनिवडणूक अधिकारी संजीव खडके आणि गिरीश केमकर यांनी दिली.
ज्या आजीव सभासदांना परिषदेच्या सध्या चालू असलेल्या निवडणूक प्रक्रियेची मतपत्रिका टपालाने (पोस्ट) मिळाली नसेल, त्या आजीव सभासदांसाठी मसापच्या मतदान केंद्रावर प्रत्यक्ष येऊन मतदान (दुबार) करण्याची संधी निवडणूक मंडळाने उपलब्ध करून दिली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आजीव सभासदांसाठी राबविण्यात येणाऱ्या दुबार मतदान प्रक्रियेला बुधवारपासून सुरुवात झाली.
त्याचा लाभ घेत पहिल्या दिवशी 53 सभासदांनी परिषदेमध्ये उपस्थित राहून मतदान केले. ही प्रक्रिया शुक्रवारपर्यंत (दि.6) सकाळी अकरा ते एक आणि दुपारी दोन ते चार या वेळेत सुरू राहणार आहे. जाहीर केलेल्या नियमावलीनुसार ही प्रक्रिया पार पडत असल्याचे ॲड. प्रताप परदेशी यांनी सांगितले.
मतदार यादीत नाव समाविष्ट असलेल्या आजीव सभासदांना टपालाद्वारे मतपत्रिका घरी पाठविण्यात आल्या. मात्र, टपालाद्वारे मतपत्रिका न मिळालेल्या आजीव सभासदांसाठी मतदान करण्याची संधी निवडणूक मंडळाने उपलब्ध करून दिली आहे. दुबार मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक नियमांची निवडणूक अधिकाऱ्यांकडून पडताळणी झाल्यानंतर 53 सभासदांनी मतदान केले.ॲड. प्रताप परदेशी, मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र साहित्य परिषद