पुणे: साहित्य संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको, असे असताना महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या बहुचर्चित निवडणुकीत साहित्य संवर्धन आघाडीच्या विजयात भाजपचा प्रभाव असल्याचे बोलले जात आहे. पण, दुसरीकडे निवडणुकीच्या प्रचारात कोणताही राजकीय प्रभाव नव्हता, असे विजयी उमेदवारांचे म्हणणे आहे.
विद्यमान कार्यकारिणीच्या परिवर्तन उत्कर्ष आघाडीचा झालेला पराभव अन् साहित्य संवर्धन आघाडीच्या विजयाने दहा वर्षांनंतर झालेला सत्तापालट, यामुळे मसापच्या सभासदांना बदल हवा, असे निकालातून पाहायला मिळाले. साहित्य संवर्धन आघाडीच्या मागे भाजपचा प्रभाव असल्याचे बोलले जात असताना त्यांच्या तुलनेत विद्यमान कार्यकारिणीच्या परिवर्तन उत्कर्ष आघाडीनेही काँटे की टक्कर दिल्याचे दिसून आले.
दहा वर्षांनंतर झालेली मसापची निवडणूक सुरुवातीपासून चर्चेत राहिली. तीन महिने निवडणुकीची प्रक्रिया चालली आणि निकालाचा दिवसही त्याच पद्धतीने ऐतिहासिक ठरला. रविवारी (दि. 15) मतमोजणीअंती निवडणुकीचा निकाल जाहीर केला. त्यात साहित्य संवर्धन आघाडीने प्रमुख तीन पदांसह चार कार्यवाहपदांवर विजय मिळविला. मसापच्या अध्यक्षपदी साहित्य संवर्धन आघाडीचे उमेदवार लेखक-अभिनेते योगेश सोमण, प्रमुख कार्यवाहपदी पत्रकार स्वाती महाळंक आणि कोषाध्यक्षपदी गझलकार प्रदीप निफाडकर विजयी झाले. तर, या निवडणुकीत विद्यमान कार्यकारिणीच्या परिवर्तन उत्कर्ष आघाडीचे प्रा. मिलिंद जोशी, सुनीताराजे पवार आणि कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांचा पराभव झाला. पण, साहित्य संवर्धन आघाडीला परिवर्तन उत्कर्ष आघाडीने काँटे की टक्कर दिली.
निवडणुकीचा हा निकाल धक्कादायक असल्याचे काहींचे म्हणणे होते, तर काहींनी साहित्य परिषदेला बदलाची गरज होती, अशी प्रतिक्रिया दिली. डिसेंबर 2025 मध्ये निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली. साहित्य परिषदेचे नूतनीकरण, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न, यशस्वीपणे साहित्य संमेलनाचे आयोजन अशा विविध कामांची यादी पुढे ठेवत आपल्याच बाजूने मतदार कौल देतील, असा विश्वास विद्यमान कार्यकारिणीला होता. सातारा येथे झालेल्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात साहित्य महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष आणि संमेलनाच्या आयोजकांनी व्यासपीठावरूनच ‘साहित्य संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप करू नये’ असा इशारा मुख्यमंत्र्यांना दिला. या घटनेनंतरच साहित्य परिषदेच्या निवडणुकीत राजकीय रंग अधिक गडद झाल्याचे बोलले जाते.
परिवर्तन उत्कर्ष आघाडीला असा बसला झटका
निवडणूक जाहीर झाल्यापासूनच परिवर्तन उत्कर्ष आघाडीला ही निवडणूक बिनविरोध होईल, असा ठाम विश्वास होता. मात्र, साहित्य संवर्धन आघाडी मोर्चेबांधणी करत निवडणूक मैदानात उतरली. या आघाडीच्या पाठीशी भाजप आणि संघपरिवाराची ताकद उभी राहिल्याचे सुरुवातीपासून बोलले जात असल्याने शेवटच्या टप्प्यात विद्यमानांची धावपळ उडाली. निकालाच्या दिवशीही संघाच्या पाठिंब्याचा परिणाम म्हणून साहित्य संवर्धनचे उमेदवार निवडून आल्याची चर्चा होती. पण, दुसरीकडे विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या कारभाराविषयी असलेली नाराजीही पराभवाला कारणीभूत ठरल्याचे मानले जात आहे.