पुणे: बदलती जीवनशैली, अयोग्य आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळे असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढत आहे. उच्च रक्तदाब, मधुमेहाचे प्रमाण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय असंसर्गजन्य आजार विशेष तपासणी मोहिमेत लाखो नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 10 लाख 5 हजार 704 जणांना उच्च रक्तदाबाचे, तर 2 लाख 88 हजार 82 जणांमध्ये मधुमेहाचे निदान झाले आहे.
आरोग्य विभागातर्फे 1 ते 28 फेबुवारी या कालावधीत ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान उच्च रक्तदाबासाठी 25 लाख 82 हजार 992 नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 10 लाख 5 हजार 704 जणांना उच्च रक्तदाब असल्याचे निदान झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. नियमित तपासणीमुळे अनेक रुग्णांमध्ये आजार लवकर ओळखता येत असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
मधुमेहाच्या तपासणीसाठी 12 लाख 52 हजार 434 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 2 लाख 88 हजार 82 जणांमध्ये मधुमेह आढळून आला असून, संबंधित रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. तज्ज्ञांच्या मते, मधुमेहासारख्या जीवनशैलीशी संबंधित आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढत असून, नियमित तपासणी आणि जीवनशैलीतील बदल अत्यंत आवश्यक ठरत आहेत.
संभाव्य धोके
उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा झटका
मधुमेह आणि त्यासंबंधित गुंतागुंत
मेंदूचा स्ट्रोक
किडनीचे विकार
मौखिक, स्तन व गर्भाशयमुख कर्करोग
दृष्टिदोष व मज्जासंस्थेचे आजार
असंसर्गजन्य आजार वाढण्याची कारणे
अयोग्य व असंतुलित आहार (जंक फूड, जास्त मीठ-साखर-तेल)
व्यायामाचा अभाव आणि बैठी जीवनशैली
वाढता लठ्ठपणा
तंबाखू, गुटखा व धूमपानाचे सेवन
मद्यपानाचे वाढते प्रमाण
मानसिक ताण-तणाव
अनियमित झोप व कामाचा ताण
उपाययोजना
दररोज किमान 30 मिनिटे व्यायाम किंवा चालणे
संतुलित व पौष्टिक आहाराचा अवलंब
तंबाखू व धूमपान पूर्णपणे टाळणे
नियमित आरोग्य तपासणी करणे
वजन नियंत्रणात ठेवणे
ताणतणाव कमी करण्यासाठी योग, ध्यान यांचा अवलंब
डॉक्टरांच्या सल्ल्याने वेळेवर उपचार व औषधोपचार घेणे
विशेष मोहिमेमुळे असंसर्गजन्य आजारांविषयी नागरिकांमध्ये जागरूकता वाढत असून, प्रारंभिक टप्प्यात निदान झाल्यामुळे गंभीर गुंतागुंत टाळण्यास मदत होणार आहे. पुढील काळातही अशा मोहिमा राबवून अधिकाधिक नागरिकांची तपासणी करण्यावर भर दिला जाणार आहे.प्रकाश आबिटकर, आरोग्यमंत्री