आशिष देशमुख
पुणे: यंदा प्राप्तिकर भरण्यात देशात सर्वाधिक विवरणपत्रे महाराष्ट्रातून दाखल झाली. तब्बल १ कोटी ४० लाख विवरणपत्रे दाखल करीत देशाच्या प्रत्यक्ष करसंकलनात महाराष्ट्राचे योगदान सातत्याने महत्त्वाचे ठरले आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये राज्यातील आयकर विभागाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
महाराष्ट्रातील आयकर संकलनात मुंबईचा वाटा सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ पुणे विभागाने चांगली कामगिरी केली. मुंबई हे देशाचे प्रमुख वित्तीय केंद्र असल्याने मोठ्या कंपन्या, वित्तीय संस्था, भांडवली बाजार आणि उच्च उत्पन्न गटातील करदात्यांमुळे येथे आयकर संकलन मोठ्या प्रमाणावर होते. आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी मुंबई प्रदेशाला ७.४४ लाख कोटींचे प्रत्यक्ष कर संकलनाचे लक्ष्य देण्यात आले होते.
पुणे विभागातून १.३३ लाख कोटींचे आयकर संकलन
मुंबईनंतर पुणे विभागाची कामगिरी विशेष उल्लेखनीय ठरली आहे. पुणे आयकर विभागाने २०२५-२६ मध्ये सुमारे १.३३ लाख कोटींचे आयकर संकलन केले. पुणे विभागाच्या करसंकलनात उत्पादन उद्योगाचा वाटा ४२ ते ४३ टक्के असून, वित्तीय क्षेत्राचा १८ टक्के आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राचा १५ टक्के वाटा आहे.
नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, ठाणे, कोल्हापूर आणि इतर जिल्ह्यांमधूनही आयकर संकलनात योगदान मिळते. मात्र, आयकर विभागाची अधिकृत आकडेवारी महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांनुसार स्वतंत्रपणे प्रसिद्ध होत नाही, ती प्रशासकीय प्रभारानुसार उपलब्ध होते.
विवरणपत्रे दाखल करण्यात महाराष्ट्र पुढे
राज्यवार उपलब्ध ताज्या आकडेवारीवरून असे दिसून येते की, संपूर्ण भारतात आयटीआर दाखल करण्याबाबत विशिष्ट राज्यांमध्ये मोठी संख्या दिसून येते. यात १.४० कोटी विवरणपत्रांसह महाराष्ट्र आघाडीवर आहे; त्यानंतर उत्तर प्रदेश (९१.७ लाख) आणि गुजरात (८८.८ लाख ) यांचा क्रमांक लागतो. ही आकडेवारी भारतातील विविध क्षेत्रांमध्ये कर नियमांचे पालन, डिजिटल पद्धतीने कर विवरणपत्र दाखल करणे आणि उत्पन्नाचे औपचारिकीकरण या गोष्टींचे वाढते महत्त्व दर्शवते.