

पुणे: रस्त्यावरील खड्ड्यामुळे सूस-म्हाळुंगे येथे अपघातात मृत्यू झालेल्या दहा वर्षांच्या मुलाच्या कुटुंबाला सहा लाख रुपये नुकसानभरपाई तातडीने द्यावी, असे निर्देश स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करून महापालिकेने स्वतःहून हे प्रकरण संबंधित समितीसमोर ठेवावे आणि नुकसानभरपाईची प्रक्रिया सुरू करावी, असे भिमाले यांनी म्हटले आहे.
सूस-म्हाळुंगे रस्त्यावरील खड्ड्यामुळे दुचाकी घसरून झालेल्या दुर्घटनेत दहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर शहरातील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर भिमाले यांनी आयुक्तांना पत्र देत मृत मुलाच्या कुटुंबाला न्यायालयाच्या आदेशानुसार नुकसानभरपाई देण्याची सूचना केली.
मुलाचा मृत्यू खड्ड्यामुळे झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत असल्यास महापालिकेने स्वतःहून हे प्रकरण समितीसमोर दाखल करावे आणि सहा लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची कार्यवाही तातडीने सुरू करावी, असे भिमाले यांनी पत्रात म्हटले आहे.
दोषींवर कारवाई करा...
संबंधित रस्त्याची देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी कोणत्या विभागाकडे होती, याची चौकशी करावी. खड्डा दुरुस्त न करण्यास जबाबदार अधिकारी, अभियंता अथवा कंत्राटदाराची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करावी तसेच खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांतील नुकसानभरपाईसाठी सोपी आणि स्वतंत्र कार्यपद्धती तयार करण्याची सूचनाही भिमाले यांनी केली.