Water Contamination Pudhari
पुणे

Maharashtra Water Contamination: राज्यातील पिण्याच्या पाण्यात रासायनिक प्रदूषणाचे संकट; नांदेड सर्वाधिक, नागपूर तिसऱ्या क्रमांकावर

जल जीवन मिशनच्या तपासणीत धक्कादायक वास्तव; नांदेडमध्ये ४१ टक्के नमुने दूषित, सोलापूर व नागपूरचीही चिंता वाढली

पुढारी वृत्तसेवा

विनय पुराणिक

पुणे: राज्यभरातील पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेनंतर पाण्यातील रासायनिक प्रदूषणामध्येही नांदेड, सोलापूरपाठोपाठ राज्याची उपराजधानी असलेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जिल्हा बाधित आढळल्याचे वास्तव समोर आले आहे. दरम्यान, याबाबत स्थानिक पातळीवर कार्यवाही करण्यात सुरुवात झाली आहे, अशी कबुली स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

जल जीवन मिशन अंतर्गत चालू आर्थिक वर्षातील जल गुणवत्ता तपासणी विभागाने राज्यभरातून प्राप्त झालेल्या पाच लाख ५ लाख ४७ हजार ६८८ पाणी नमुन्यांपैकी एक लाख ७२ हजार ८८८ नमुन्यांची रासायनिक गुणवत्तेच्या आधारे स्वतंत्र तपासणी करण्यात आली आहे. पूर्व मान्सून आणि उत्तर मान्सून याप्रमाणे प्राप्त नमुन्यांनुसार पाण्यातील आम्ल, विरघळलेले क्षार, आयर्न, कॅल्शियम-मॅग्नेशियम, क्लोराईड, सल्फेट, नायट्रेट, लोह, मॅंगेनीज, अमोनियम, शिसे, तांबे, झिंक, बोरॉन यांचे कमी अधिक प्रमाण तपासण्यात आले आहेत.

नांदेड जिल्ह्यातील सात हजार १३३ पाण्याच्या नमुन्यापैकी दोन हजार ९५३ म्हणजे सुमारे ४१ टक्के पिण्याचे पाणी दूषित असल्याचे तपासणी अहवालातून स्पष्ट होत आहे. त्यापाठोपाठ सोलापूर जिल्ह्याची परिस्थिती गंभीर असून १२ हजार ८२ नमुन्यांपैकी दोन हजार ५६० (२१.१९ टक्के) पाणी दूषित असून तिसऱ्या क्रमांकावर नागपूर जिल्हा आहे. नागपूर जिल्ह्यातून सहा हजार ६५ पाण्याच्या नमुन्यांपैकी एक हजार ९०४ नमुन्यांमध्ये रासायनिक प्रमाणक कमी अधिक आढळून आले.

राज्यभरात गांभीर्याने लक्ष देण्याची गरज

छत्रपती संभाजीनगरमध्ये ३९०, नाशिकमध्ये ७१४, यवतमाळमध्ये ५३२ आणि जळगावमध्ये १४७ नमुने रासायनिकदृष्ट्या दूषित आढळले आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या रासायनिक गुणवत्तेकडे जिल्हानिहाय गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, असे प्रयोगशाळांमधील वैज्ञानिक सांगतात.

नांदेड जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यासाठी गोदावरी नदीतील पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. उगमापासून नांदेड जिल्ह्यात पाणी येईपर्यंत मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असेल याबाबत सांगता येत नाही. परंतु स्थानिक पातळीवर नदीपात्रालगत स्वच्छता, कचरा निर्बंध करण्यास जलसंपदा विभागाला निर्देश देण्यात आले आहेत. तसेच नदी लगतच्या भागातील बागायती क्षेत्र असल्याने शेतकऱ्यांमध्ये रासायनिक औषधांच्या वापराबाबत जनजागृती करण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे.
महेश पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT