सुनील जगताप
पुणे: राज्यात पावसाळ्यातील बदलांमुळे कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. आरोग्य विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार, १ जानेवारी ते १४ ऑगस्ट या कालावधीत राज्यात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ दिसून येत आहे. आकडेवारीचे तुलनात्मक विश्लेषण केले असता, २०२५ मधील १४ ऑगस्टपर्यंतच्या डेंग्यूच्या ४,३४४ रुग्णांच्या तुलनेत, २०२६ मध्ये याच कालावधीत ५,५५८ रुग्ण आढळले आहेत.
हिवताप (मलेरिया)च्या रुग्णसंख्येत गतवर्षीच्या तुलनेत काहीशी घट झाली असली तरी, डेंग्यूने राज्यात डोके वर काढल्याचे स्पष्ट होत आहे. सध्या गडचिरोली आणि मुंबईसारख्या भागांत हिवाळा नियंत्रण विशेष मोहीम युद्धपातळीवर राबवण्यात येत आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत राज्यात हिवतापेचे ११,३८३ रुग्ण, डेंग्यूचे ५,५५८ आणि चिकनगुनियाचे १,०४८ रुग्ण नोंदवण्यात आले आहेत.
डेंग्यूमुळे आतापर्यंत ३ मृत्यूची नोंद झाली आहे. उपाययोजना आणि जनजागृती करत राज्य सरकारने या आजारांच्या नियंत्रणासाठी कंबर कसली आहे. यामध्ये जलद ताप सर्वेक्षण, ८९ सेंटिनेल सेंटर्स (हिवतापासाठी) आणि ५० सेंटिनेल सेंटर्स (डेंग्यू व चिकुनगुण्यासाठी) कार्यान्वित करण्यात आले आहेत.
हिवताप : वर्ष २०२५ मध्ये एकूण २३,८२१ रुग्ण नोंदवले गेले होते. १४ ऑगस्ट २०२५ पर्यंत १२,८९९ रुग्ण होते, तर १४ ऑगस्ट २०२६ पर्यंत ही संख्या कमी होऊन ११,३८३ झाली आहे.
डेंग्यू : वर्ष २०२५ मध्ये एकूण १४,१६८ रुग्ण आढळले होते. १४ ऑगस्ट २०२५ पर्यंत ४,३४४ रुग्ण होते, तर १४ ऑगस्ट २०२६ पर्यंत हे प्रमाण वाढून ५,५५८ झाले.
चिकनगुनिया : वर्ष २०२५ मध्ये एकूण ३,४४४ रुग्ण नोंदवले गेले. १४ ऑगस्ट २०२५ पर्यंत १,५१२ रुग्ण होते, तर १४ ऑगस्ट २०२६ पर्यंत ही संख्या कमी होऊन १,०४८ झाली आहे.
राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत डेंग्यूचे प्रमाण अधिक असले तरी चिकनगुनिया आणि हिवताप याची संख्या कमी आहे. राज्यातील सर्व आरोग्य यंत्रणा सज्ज असून, रुग्णांची संख्या नियंत्रित करण्यावर भर दिला जात आहे. तसेच जनजागृती मोहीम ही राबवली जात आहे.डॉ. संदीप सांगळे, अतिरिक्त संचालक, राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण.