पुणे: राज्याच्या कृषी आकृतिबंधामध्ये भेदभाव होऊन अन्याय झाल्याची भावना कृषी महासंघाने मांडली आहे. त्यावर मंगळवारी (दि.८ सप्टेंबर) लगेचच कृषी सचिव, कृषी आयुक्त, मी स्वतः आणि कृषी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेत आहे. तुम्हाला विश्वासात घेऊन आवश्यक बदलांसह मार्ग काढून न्याय हा दिला जाईल, असा शब्द राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोमवारी कृषी आयुक्तालया समोरील आंदोलनस्थळी येत राज्यातील कृषी कर्मचाऱ्यांना दिला.
मात्र, मंजूर केलेला आकृतिबंध रद्द करणे, तज्ज्ञ समिती गठित करून नव्याने आकृतिबंध करणे व दोषींवर ठोस कारवाई करण्याच्या मागण्यांवर कृषिमंत्री भरणे यांनी भाष्य करणे टाळले. त्यामुळे पूर्वघोषित केल्यानुसार आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य कृषिसेवा महासंघाने नंतर जाहीर केल्यामुळे याप्रश्नीचा तिढा कायम राहिला आहे. राज्यभरातील सुमारे दहा हजारांहून अधिक कृषी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी रजा घेऊन सोमवारी (दि.७) कृषी आयुक्तालया समोर कृषिसेवा महासंघाच्या नेतृत्वाखाली दिवसभर धरणे आंदोलन केले.
महासंघाचे अध्यक्ष बाबासाहेब जेजूरकर यांच्यासह संघटनांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये हितेंद्र पगार, विलास रिंढे, संजय काचोळे, विजयकुमार राऊत, विनायक कदम, प्रसिद्धीप्रमुख शेषराव डोळे, बाळासाहेब चापले यांच्यासह सेवानिवृत्त कृषी संचालक डॉ. सुदाम अडसूळ, रामकृष्ण मुळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. दुपारी दोनच्या सुमारास कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आंदोलनस्थळी येऊन भूमिका मांडली. त्यांच्यासमवेत कृषी संचालक सुनील बोरकर व विनयकुमार आवटे उपस्थित होते. कृषिसेवा महासंघाचे अध्यक्ष बाबासाहेब जेजूरकर म्हणाले, यापूर्वी मागण्या मांडल्या आहेत. मात्र, संयुक्त बैठकीशिवाय कोणतेच आश्वासन न दिल्याने टप्पेनिहाय आंदोलन सुरूच ठेवू.
घोषणा, टाळ्यांनी कृषी कर्मचाऱ्यांच्या एकजुटीचा एल्गार
आंदोलनस्थळी आकृतिबंध रद्द करण्यासाठीची प्रमुख मागणी केली जात होती. ‘ज्यांना नाही मातीचा गंध, त्यांनी केला आकृतिबंध’ या कृषी विभागाच्या आस्थापना शाखेस रडारवर घेऊन झालेल्या घोषणेस सर्वाधिक टाळ्या पडत होत्या. शपथ आहे मातीची, एकमेकांच्या साथीची... या घोषणांसह सभेत झळकत असलेले विविध फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
...पण नाराजीचा सूर कायम
आंदोलनासाठी माझ्याच कुंटुंबातील उपस्थित असलेले राज्यातील सर्व कृषी अधिकारी, बंधू आणि भगिनींनो, असे आपुलकीने सुरू केलेल्या भाषणाने कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे स्वागत जोरदार टाळ्या वाजवून केले गेले. मात्र, शेवटपर्यंत त्यांनी संयुक्त बैठकीव्यतिरिक्त बोलणे टाळल्याने उपस्थित कर्मचाऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटला.
राज्याचा कृषी राज्यमंत्री म्हणून मी काम केलेले आहे. मात्र, ज्यांना शेतीमधील कळत नाही, अशा लोकांकडे निर्णयाचे अधिकार गेल्यामुळे चूक झाली आहे. त्यामुळे मंजूर झालेला आकृतिबंध चुकीचा असून, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आपल्याला नव्याने आकृतिबंध करावा लागेल. त्यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यांशी बोलणार आहे. आमदार म्हणून मी विधानसभेत आवाज उठवेल आणि मी कृषी महासंघाबरोबर आहे.विश्वजित कदम, आमदार, काँग्रेस.
नव्या आकृतिबंधाने पाच हजार पदे गायब होणार आहेत. त्यामुळे झालेला आकृतिबंध रद्द करावा, या रास्त मागण्यांना माझा पाठिंबा आहे. पदे कमी करण्यामागे सरकार खर्च कमी केल्याचे कारण देत असेल, तर एक लाख ४० हजार कोटींचा शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा. आकृतिबंध कोणालाच विश्वासात न घेता झाला असून, मी सरकारला अल्टिमेटम देत आहे, कृषी आकृतिबंध हा विषय हलक्यात घेऊ नये. हे आम्ही कदापि होऊ देणार नाही.रोहित पवार, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष.