Recruitment Pudhari
पुणे

Maharashtra Agricultural Universities Staff Pattern: राज्यातील कृषी विद्यापीठांच्या सुधारित आकृतिबंधाला मान्यता; भरतीचा मार्ग मोकळा

महाराष्ट्रातील चार कृषी विद्यापीठांच्या सुधारित आकृतिबंधाला तत्त्वतः मान्यता मिळाल्याने रिक्त पदभरतीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता असून संशोधन व विस्तार कार्याला गती मिळणार

पुढारी वृत्तसेवा

किशोर बरकाले

राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या सुधारित आकृतिबंधाला (रिव्हाईज स्टापिंग पॅटर्न) वित्त मंत्रालयासह उच्चस्तरीय समितीनेही तत्त्वतः मान्यता दिल्याचे सांगण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या (आयसीएआर) धर्तीवरच हा समकक्ष आकृतिबंध तयार केलेला असल्याने सर्वच कृषी विद्यापीठात एकसूत्रता व समानता आणण्यास पाठबळ दिल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांकडून समजली.

याबाबतचा शासन निर्णयही लवकरच जारी होण्याची अपेक्षा असून, प्रस्तावित आकृतिबंधावर शिक्कामोर्तब झाल्यास रिक्त पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यताही विद्यापीठ सूत्रांकडून वर्तविण्यात आली.

राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये सध्या प्राध्यापकांसह बहुतांश कर्मचाऱ्यांची 40 टक्क्यांहून अधिक पदे रिक्त आहेत. त्यामुळे शेतीच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर कृषी विद्यापीठांनी संशोधन व विस्तार कार्याची व्यक्त होणारी अपेक्षा पूर्णत्वास जात नसल्याची वस्तुस्थिती आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रलंबित असलेला सुधारित आकृतिबंध अंतिम झाल्यास नव्याने पदभरतीचा मार्ग मोकळा होण्याची आशा आहेे.

चारही कृषी विद्यापीठ स्तरावरील यापूर्वीची मंजूर पदसंख्या 12 हजार 142 इतकी होती. ती आता 11 हजार 346 पदांपर्यंत खाली येण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. म्हणजेच 796 पदे नव्या आकृतिबंधात कमी केल्याची शक्यता कृषी विद्यापीठांतील वरिष्ठ सूत्रांकडून वर्तवली. ज्यामध्ये प्रामुख्याने ‌‘ड‌’ वर्गातील अनावश्यक कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्यावर भर दिल्याचे सांगितले. फोटो फिल्मसाठी अंधार कोठडी सहायक, तबेलावाला असे कालबाह्य झालेली पदे कमी करण्याचा समावेश असल्याचे समजते.

आकृतिबंधात प्राधान्य कशासाठी?

  • राज्यातील कृषी विद्यापीठांना केंद्राच्या आयसीएआर संस्थेकडून 50 टक्के निधी मिळतो. त्यामुळेच त्यांच्या नियमानुसार आकृतिबंध केल्याने येणाऱ्या अडचणी कमी होऊन कामे सुरळीत होण्यावर भर दिला आहे.

  • कृषी विद्यापीठांच्या प्रक्षेत्रावर (फार्म मॅनेजमेंट) विविध पिकांचे बीजोत्पादन वाढून कृषी विस्ताराचे कार्यवाढीसाठी अधिक पदे देण्यावर कल आहे. शिवाय, संशोधन केंद्रावर अधिक शास्त्रज्ज्ञ व आवश्यक कर्मचाऱ्यांच्या नेमणुकांस प्राधान्य दिले आहे.

  • कृषी संशोधनात काळानुरूप कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञान वाढणार असल्यानेही त्यासाठीही स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यासाठी पावले उचलण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT