महाळुंगे पडवळ: आंबेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील चिंचोली-चास-महाळुंगे या गावांना जोडणाऱ्या रस्त्याच्या कामाबाबत गंभीर अनियमितता समोर येत असून, निकृष्ट दर्जाच्या कामामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. सुमारे दीड कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेला हा रस्ता अनेक ठिकाणी दर्जाहीन झाल्याची तक्रार होत आहे.
चिंचोली परिसरात सुमारे २०० मीटर काँक्रिटीकरण निकृष्ट झाल्यामुळे ते पुन्हा उखडून टाकावे लागल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यासह गिधड ओढ्यावर बांधण्यात आलेल्या पुलाच्या कामात काँक्रीटमध्ये दगड-गोट्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. रस्त्यावर करण्यात आलेल्या डांबरीकरणाची जाडी कमी असल्याचेही स्पष्ट दिसत असून, अनेक ठिकाणी अपेक्षित खडीच्या दोन थरांऐवजी एकच थर टाकण्यात आला आहे.
याशिवाय रस्त्याच्या दुतर्फा साइडपट्ट्या भरल्या नसल्यामुळे रस्त्याची रुंदी कमी झाली असून, अपघाताचा धोका वाढला आहे. या मार्गाचे काम मागील वर्षांपासून रखडलेले असून, कामाच्या विलंबामुळे ओढ्यावरील पुलावर यापूर्वी एक गंभीर अपघात घडला होता.या दुर्घटनेत एका टेम्पोचालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण विभागाकडून देण्यात आलेले तपासणी दाखले 'मॅनेज' करून मिळविले असल्याची शंका व्यक्त होत आहे.
त्यामुळे या संपूर्ण कामाची त्रयस्थ एजन्सीमार्फत स्वतंत्र व सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत ग्रामस्थांनी राज्याचे माजी गृहमंत्री तथा आमदार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे तक्रार करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, या कामाबाबत संबंधित ठेकेदार कंपनी पंजाबी कन्स्ट्रक्शन यांचा भ्रमणध्वनी संपर्क क्षेत्राबाहेर दाखविण्यात येत होता.
या रस्त्याच्या कामाचे संपूर्ण ऑडिट करण्यात यावे. वापरण्यात आलेले साहित्य निकृष्ट दर्जाचे आहे. पुलाच्या कामात गंभीर त्रुटी आहेत. हे काम सार्वजनिक बांधकाम विभाग घोडेगाव यांच्यामार्फत सुरू असून, कामाबाबतचा माहितीफलकही कुठेच लावलेला नाही, ही बाबही संशयास्पद आहे.बाबाजी चासकर, अध्यक्ष, हुतात्मा बाबू गेनू युवा प्रतिष्ठान