लोणी काळभोर: यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या हद्दीत गेल्या सुमारे तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या कोळसा भट्टीबाबत दै. 'पुढारी' तसेच 'पुढारी' ऑनलाईन मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर वनविभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित ठिकाणी छापा टाकून कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान कोळसा भट्टीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले असून, संबंधित भट्टी उध्वस्त करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया वनविभागाकडून सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
वनविभाग कोणावर गुन्हा दाखल करणार
वनविभागाकडून आता या प्रकरणी गुन्हा कोणावर दाखल होणार याची उत्सुकता हवेली तालुक्यात पसरली आहे का चोर सोडून संन्याशाला फाशी याची जोरदार चर्चा सुरू आहेयशवंत सहकारी साखर कारखान्याच्या हद्दीत कोळसा भट्टी सुरू असल्याचा प्रकार समोर आल्यानंतर परिसरातील नागरिकांकडून याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. भट्टीमधून धुराचे लोट निघत असल्याचा तसेच मोठ्या प्रमाणात कोळसा निर्मिती सुरू असल्याचा आरोप करण्यात आला होता.
विशेष म्हणजे, संबंधित ठिकाणापासून हाकेच्या अंतरावर वनविभागाचे कार्यालय असल्याचे सांगितले जात असल्याने, इतका कालावधी हा प्रकार सुरू कसा राहिला, असा सवालही उपस्थित करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित ठिकाणी पाहणी करून कारवाई केली. कारवाईदरम्यान भट्टीसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले असून, भट्टी उध्वस्त करण्यात आली आहे. या कारवाईमुळे कथितरीत्या सुरू असलेल्या कोळसा निर्मितीच्या प्रकाराला आळा बसला आहे.
दरम्यान, या भट्टीला आवश्यक शासकीय परवानग्या होत्या का, जागेचा वापर कोणाच्या परवानगीने करण्यात आला होता, तसेच पर्यावरणीय व वनविषयक नियमांचे पालन करण्यात आले होते का, याबाबतही तपास होणे अपेक्षित आहे. संबंधित जागा यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या हद्दीत असल्याने कारखाना प्रशासनाला या प्रकाराची माहिती होती का, जागा वापरण्यास कोणाची परवानगी होती आणि भट्टी इतका कालावधी सुरू कशी राहिली, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.
वनविभागाकडून आता या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू असून, संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. तपासात नियमांचे उल्लंघन किंवा आवश्यक परवानग्यांचा अभाव आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे. वनविभागाच्या या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात असून, केवळ भट्टी उध्वस्त करण्यापुरती कारवाई न करता या प्रकारामागे कोण होते, भट्टी सुरू करण्यासाठी परवानगी कोणी दिली आणि संबंधितांकडे आवश्यक कागदपत्रे होती का, याचाही सखोल तपास करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. आता वनविभागाच्या तपासातून या कथित कोळसा भट्टीप्रकरणातील पुढील सत्य समोर येण्याची प्रतीक्षा आहे.