पुणे : पुढारी वृत्तसेवा : भाजपच्या इन्कम टॅक्स, ईडी, जीएसटी यांसारख्या शस्त्राच्या भीतीने आपल्या देशातील 17 लाख लोक देश सोडून परदेशात गेले. याचे उत्तर द्यायला कोणीही पुढे येत नाही, असे स्पष्ट मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. वंचित बहुजन आघाडीच्या पुणे संघाचे उमेदवार वसंत मोरे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ. अन्वर शेख यांच्या प्रचारार्थ अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या पुण्यात दोन जाहीर सभा पार पडल्या. याप्रसंगी ते बोलत होते. नदीपात्रातील सभेला प्रकाश आंबेडकर यांच्या पत्नी अंजली आंबेडकर, मुलगा सुजात आंबेडकर यांच्यासह वंचितचे उमेदवार पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
अॅड. आंबेडकर म्हणाले, पुणे स्मार्ट सिटी करण्याचा नेहमी गवगवा केला जातो. मात्र, पुणे स्मार्ट सिटी होण्याऐवजी पाण्याचे
प्रश्न येथे निर्माण झाले आहेत. मोदींनी दारूड्याप्रमाणे देश विकायला काढला आहे. 70 टक्के रेल्वे विकली. एअर इंडिया, एलआयसी, ऑईल कंपन्या विकल्या. देशावरील कर्जात वाढ झाली आहे. मोदींवर टीका केली की, जेल नक्की ! यामुळे काँग्रेसवालेदेखील त्यांच्यावर टीका करायला घाबरत आहेत. तसेच पुण्याची मेट्रो ही वाया गेलेली इन्व्हेसमेंट आहे. यामुळे देशावरील कर्जात वाढ झाली आहे.
ते पुढे म्हणाले, विकास झाला म्हणून सर्वत्र चर्चा असते, मला विचारायचे आहे की, नक्की विकास कशाचा झाला ? विकास झाला तो रस्त्याचा ! मला सांगायचंय… रस्त्याचा विकास झाला म्हणजे देशाचा विकास होत नाही. रस्त्याच्या पलीकडेसुध्दा विकास आहे, तो म्हणजे झोपडपट्टीचा. या भागांचा विकास करण्याची जबाबदारी शासनाने बिल्डरांना दिली आहे, हे बिल्डर काय विकास करणार ? झोपडपट्टी भागातील लोकांचा विकास बिल्डरांनी नव्हे, तर शासनाने केला पाहिजे. तरच गरीब झोपडपट्टी भागातील विकास होणार आहे. तसेच, भाजपने जाहीर केलेय संविधान बदलणार, हुकूमशाही आणणार, याला आपण सर्वांनी एकत्र येऊन उत्तर द्यायला हवे.