खोर: नुकत्याच झालेल्या दमदार पावसाने वरवंड (ता. दौंड) येथील ऐतिहासिक व्हिक्टोरिया तलाव 100 टक्के भरला आहे. त्यामुळे या तलावावर अवलंबून असलेल्या आठ गावांना दिलासा मिळाला आहे. येथील जलजीवन योजनाही सुरळीत सुरू राहणार असल्याने ग्रामस्थांसह शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले.
गेल्या दोन-तीन वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी असल्याने हा तलाव कोरडा पडण्याची वेळ आली होती. त्यामुळे शेतकर्यांसह ग्रामस्थांमध्ये चिंता निर्माण झाली होती. मात्र, यंदा मान्सूनने दमदार हजेरी लावल्याने तलाव अवघ्या चार ते पाच दिवसांतच पूर्ण भरला. त्यामुळे या तलावावर अवलंबून असलेल्या गावांना शेतीसाठी व जलजीवन योजनांसाठी वर्षभर तरी दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. (Latest Pune News)
व्हिक्टोरिया तलाव वरवंड आणि आसपासच्या गावांसाठी सिंचनाचा मुख्य स्रोत मानला जातो. दौंड तालुक्यातील पाटस, कुसेगाव, खोर, पडवी, वरवंड, कडेठाण, देऊळगावगाडा, कानगाव या आठ गावांना या तलावातून पाणीपुरवठा होतो.
पाटस, गिरीम तसेच भिगवण शाखा कालव्याचे सिंचन व्यवस्थापन देखील याच तलावावर अवलंबून आहे. पाणीपुरवठा योजना, महाराष्ट्र प्राधिकरण जलजीवन पाणी मिशन योजनेअंतर्गत राष्ट्रीय पेयजल योजना, केंद्र शासनाची जलजीवन योजना या योजनांना व्हिक्टोरिया तलावातून पाणीपुरवठा केला जात आहे.
कुरकुंभ येथील औद्योगिक केमिकल वसाहत, वायनरी प्रकल्प तसेच बारामती तालुक्यातील जनाई उपसा योजना या सर्व पाणी योजनांना वरवंड तलाव हाच एकमेव आधार ठरत असतो. गेल्या वर्षी मे महिन्यात 62 टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. मात्र, या वर्षी मे महिन्यातच हा तलाव 100 टक्के भरला.
या वर्षी लवकर व समाधानकारक पाऊस झाल्याने व्हिक्टोरिया तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. यामुळे पिण्याच्या पाण्यासोबतच शेतीसुद्धा सक्षम होणार आहे. ग्रामस्थ व शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आठ गावांना वर्षभर पाणीटंचाई भासणार नाही. जलजीवन पाणी योजनांद्वारे गावोगावी शुद्ध पाणी पोहोचवण्याची कार्यवाही सुरू आहे.राहुल वर्हाडे, शाखा अधिकारी, खडकवासला जलसंपदा विभाग, वरवंड.