पुणे : पुढारी वृत्तसेवा : हिंजवडीमधील 37 आयटी कंपन्यांच्या स्थलांतराला राज्यातील ट्रिपल इंजिन खोके सरकार जबाबदार आहे. हे सरकार केवळ घरं फोडा, इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी यात व्यस्त आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केला. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी त्यांच्या सारसबागेसमोरील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. त्या म्हणाल्या, फॉक्सकॉन प्रकल्पही पुण्यात येणार होता मात्र तो आला नाही.
अनेक उद्योग आपल्या राज्यातून दुसर्या राज्यात जात आहेत. हिंजवडी राजीव गांधी इन्फोटेक पार्क हे शरद पवार यांच्या दूरदृष्टीतून सुरू झाले. त्यात फेज-1, फेज-2, फेज-3 असे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर उभे करण्यात आले. यासाठी देशातून लोक आले, गुंतवणूक केली. मात्र आज तेथील परिस्थितीमुळे 37 आयटी कंपन्या स्थलांतरित झाल्या आहेत, हे महाराष्ट्रातील ट्रिपल इंजिन खोके सरकारचे आणखी एक अपयश समोर आले आहे.
हिंजवडी आयटी पार्कच्या पायाभूत सुविधा, पाण्याचा प्रश्न यासाठी मी स्वतः अनेकदा तिथे बैठका घेतल्या आहेत. अनेकदा पालकमंत्र्यांकडे चर्चा केली. मात्र राज्यातील सरकारकडे उद्योगांबद्दल गांभीर्य नाही. हे सरकार फक्त घरे फोडा, इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी यात इतके व्यस्त आहे की, त्यांना बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराकडे पाहायला वेळ नाही, असेही सुळे म्हणाल्या.
हेही वाचा