Khelo India Pudhari
पुणे

Khelo India Policy Changes: ‘खेलो इंडिया’ धोरणात बदलांचे संकेत; श्रीनगरमध्ये चिंतन शिबिर

महाराष्ट्राचा दबदबा कायम; क्रीडा क्षेत्रासाठी नवे नियम लवकरच लागू होणार

पुढारी वृत्तसेवा

सुनील जगताप

पुणे: केंद्र सरकारच्या वतीने ‌‘खेलो इंडिया‌’ ही योजना 2018 मध्ये कार्यान्वित केली. या स्पर्धेत महाराष्ट्राने पाच वेळा सर्वसाधारण विजेतेपद पटकावले असून, दोन वेळा उपविजेतेपद पटकाविले आहे. मात्र, आता या स्पर्धेच्या धोरणांमध्ये काही बदल करण्यात येणार असून, केंद्रपातळीवर त्यासंदर्भात चिंतन शिबिर आयोजित करण्यात आल्याची माहिती क्रीडा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितली.

निसर्गाचे नंदनवन मानल्या जाणाऱ्या काश्मीरच्या भूमीवर सध्या भारतीय क्रीडा क्षेत्राचा भविष्यातील नकाशा कोरला जात आहे. आगामी दशकात भारताला जागतिक क्रीडा नकाशावर महासत्ता बनविण्यासाठी ‌‘चिंतन शिबिरा‌’चा श्रीगणेशा करण्यात आला आहे.

काश्मीर खोऱ्यातील श्रीनगर तीन दिवसीय चिंतन शिबिर आयोजित करण्यात आले असून, या बैठकीत क्रीडा क्षेत्रासाठी सुधारित अध्यादेशावर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. या बैठकीला प्रत्येक राज्याचे क्रीडामंत्री, सचिव आणि इतर अधिकारी उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रातून क्रीडामंत्री, क्रीडा सचिव आणि उपसंचालक संजय सबनीस चर्चेत सहभागी होणार आहेत. या शिबिराच्या बैठकीत खेळाडूंच्या प्रशिक्षणापासून ते त्यांच्या सोयी-सुविधांपर्यंतच्या नियमांत आमूलाग््रा बदल करण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

केंद्र सरकारने 2018 साली या स्पर्धेला दिल्ली येथून सुरुवात केली. त्यामध्ये महाराष्ट्राने दुसरे स्थान पटकावले होते. त्यानंतर पुणे, गुवाहाटी, भोपाळ, चेन्नई आणि पाटणा येथे महाराष्ट्राने पहिले स्थान, तर पंचकुला येथे दुसरे स्थान मिळविले. महाराष्ट्राच्या संघाने प्रामुख्याने जलतरण, जिम्नॅस्टिक, कुस्ती, वेटलिफ्िंटग आणि खो-खो यांसारख्या खेळांमध्ये पदके मिळवित दबदबा निर्माण केला.

श्रीनगर येथे होणाऱ्या बैठकीमध्ये प्रत्येक राज्यात सुरू असलेल्या विविध योजनांचा आढावा घेऊन त्यामधील त्रुटींवर चर्चा होणार आहे. प्रत्येक राज्यातील सर्व योजना एकत्रीकरण करून नवा पर्याय देण्याचा विचार आहे. त्यातून खेलो इंडिया स्पर्धेची धोरणे आणि नियम बदलण्यावरही चर्चा होणार आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात स्पर्धेचे ठिकाण आणि तारीख याबाबत अध्यादेश निघण्याची शक्यताही अधिकाऱ्यांनी वर्तविली.

2036 च्या ऑलिम्पिकचे लक्ष्य

भारताने 2036 च्या ऑलिम्पिक आणि कॉमनवेल्थ स्पर्धांच्या यजमानपदासाठी कंबर कसली असून, केंद्र सरकार यासाठी विशेष पुढाकार घेत आहे. या चिंतन शिबिरात प्रलंबित निर्णयांना गती देऊन खेळाडूंसाठी पोषक वातावरण निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे.

खेलो इंडिया स्पर्धेच्या काही नियमात बदल करण्याचा विचार केंद्रपातळीवर सुरू असून, पॉलिसी बदलण्यात येणार आहे. त्यासाठी काश्मीर येथे सर्वच राज्यांतील क्रीडामंत्री, क्रीडा सचिव आणि अधिकाऱ्यांचे चिंतन शिबिर असून, त्यामध्ये काही बदल अपेक्षित आहेत. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात याबाबतचा अधिकृत अध्यादेश केंद्र सरकारकडून मिळेल.
सुधीर मोरे, सहसंचालक, क्रीडा व युवक सेवा संचालनालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT