Khadakwasla River Encroachment Pudhari
पुणे

Khadakwasla River Encroachment: महापुराचे भय संपत नाही भाग १: नदीपात्राचा गळा आवळला

ड्रेनेजलाईनमधील कचराही साफ होत नसल्याने पाण्याचा निचरा नाही

पुढारी वृत्तसेवा

आशिष देशमुख

पुणे: खडकवासला ते सिंहगड रस्त्यावरील नदीपात्रात मोठी अतिक्रमणे अलीकडच्या काळात झाली आहेत. रेड लाईन आणि ब्लू लाईनची तमा न बाळगता नदीपात्रात वाट्टेल तिथे बांधकामे झाली आहेत. तसेच, ड्रेनेजलाईनमधील कचरा साफ होत नसल्यानेही यंदा केवळ २७ हजार क्युसेक वेगाने नदीपात्रात पाणी सोडल्यानंतर एकतानगर, आनंदनगर हे भाग पाण्याखाली का गेले? त्याचे हे गुगल अर्थवरून काढलेले लाईव्ह पुरावे पाहा.

शहरात पाऊस आला की, पहिल्यांचा काळजी वाटते ती सिंहगड रस्त्यावरील एकतानगर, आनंदनगर, विठ्ठलनगर या भागांची कारण मुसळधार पाऊस सुरू झाला की, खडकवासला धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू होते.

मागच्या वर्षी ४५ हजार क्युसेक वेगाने नदीपात्रात पाणी सोडले. त्यानंतर एकतानगरसह काही भाग तत्काळ पाण्याखालीगेला. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना त्याभागात धाव घ्यावी लागली.

...या कारणांमुळे वारंवार पूर येतो

  • खडकवासला ते सिंहगड रस्ता या मार्गावरील नदीपात्रात शेकडो अतिक्रमणे झाली आहेत.

  • २०१४ मध्ये नदीपात्र जसे मोकळे दिसत आहे. तसे आज २०२६ मध्ये नाही बारा वर्षांत हेच आपल्या मुठा नदीचे पात्र आहे काय? असा प्रश्न पडतो.

  • तसेच नदीपात्रात आरएमसी (रेडीमिक्स कॉक्रीट) प्लांट मोठ्या प्रमाणावर झालेले दिसत आहेत. त्याचा राडारोडा मोठ्या प्रमाणावर पात्रात सोडला जात आहे. त्यामुळेही पात्र अधिक अरुंद होत आहे.

  • ड्रेनेजलाईन साफ केल्या जात नाहीत. त्यात प्रचंड मोठ्या प्रमाणावर वारंवार कचरा अडकला जातो. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा लवकर होत नाही.

  • त्यामुळे नदीपात्रात धरणातून यंदा थोडे पाणी सोडले तरी सिंहगड रस्त्यावरील काही कॉलनी पाण्याखाली गेल्या

महापालिका- जलसंपदामध्ये तू-तू -मै-मै...

शहराचे नदीपात्र लहान झालेले आहे. दिवसेंदिवस त्यात अजून बदल होत आहे.याकडे कोणाचेही लक्ष नाही. पात्रातील वारेमाप अतिक्रमाणांचा अंदाज असला तरी त्याकडे हेतुपुरस्सरपणे डोळे झाक सुरू आहे.

पर्यावरणतज्ज्ञ याकडे वारंवार लक्ष वेधतात. मात्र, त्याची दखल कुणी घेत नाही. मात्र, जेव्हा पावसाळा सुरू होतो अन् पूर येऊन नागरिकांची घरे पाण्याखाली जातात, तेव्हा हा वाद सुरू होतो. महापालिका अन् जलसंपदा अधिकाऱ्यांत वाद सुरू होतो.

जलसंपदा अधिकाऱ्यांच्या मते ही जबाबदारी सर्व महापालिकेची आहे. त्यांच्या मते ग्रीन लाईनमधील अतिक्रमणे तात्काळ हटवली पाहिजेत. मात्र, ही कारवाई करणार कोण? यावरून दोन विभागांत सारखा वाद सुरू असतो.

SCROLL FOR NEXT