पुणे: खडकवासला-मुळशी परिसरातील खडकवासला फुरसुंगी भूमिगत बोगदा प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून, दोन वर्षांत हे काम पूर्ण होईल. हे काम पूर्ण झाल्यानंतर खडकवासला धरणातून निघणाऱ्या सुमारे 30 ते 32 किलोमीटर लांबीच्या जुन्या कालव्याच्या जागेच्या पुनर्वापराबाबतही शासन धोरण ठरविणार असल्याची माहिती जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
विधानसभेत खडकवासला-फुरसुंगी बोगदा प्रकल्प, चिबड जमिनीसंदर्भातील धोरण, टाटा पॉवरचे पाणी मिळणे व उजनी धरणाच्या बॅकवॉटरवर बॅरेज बांधणे आदी प्रश्नांसंदर्भात दौंडचे आमदार राहुल कुल व पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या वेळी आमदार कुल यांनी खडकवासला ते फुरसुंगी या बोगदा प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यावर जुन्या कालव्याची जी जागा आहे ती मेट्रो, रस्ते यासाठी वापरण्यात यावी, अशी मागणी करीत शासनाने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली. यावर जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उत्तर दिले.
मंत्री विखे पाटील म्हणाले की, जुन्या कालव्यालगत सुमारे 370 हेक्टर जागा उपलब्ध असून, सध्या त्या भागातील अतिक्रमणे हटवून जागा सुरक्षित करण्याचे काम जलसंपदा विभागाने सुरू केले आहे. बोगद्याचे काम पुढील दोन वर्षांत पूर्ण होण्याची अपेक्षा असून, त्यानंतर खालच्या भागातील शेतकऱ्यांनाही पाणी उपलब्ध होईल. कालव्याच्या उपयुक्ततेसंदर्भात धोरण तयार करणार आहोत. मुळशी परिसरातील टाटा धरणातून पाणी उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासनाची टाटा पॉवरशी चर्चा सुरू असून, तत्त्वतः पाणी उपलब्ध करून देण्याचे त्यांनी मान्य केले आहे.
किमान सात ते आठ टीएमसी पाणी उपलब्ध करण्याचा शासनाचा प्रयत्न असून, पुढील दोन-तीन महिन्यांत याबाबत ठोस निर्णय होईल, असेही त्यांनी या वेळी सांगितले. कोपा बंधाऱ्याचे रूपांतर बॅरेजमध्ये करण्याचे धोरण ठरविले असून, कार्यवाही करीत आहोत. दौंड, श्रीगोंदा व कर्जत तालुक्यांतील मागील भागातील गावांना पाण्याचा तुटवडा जाणवू नये, यासाठी मोठे बॅरेज उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. लाभक्षेत्राबाहेरील चिबड जमिनीसंदर्भात शासनाने प्रायोगिक तत्त्वावर प्रकल्पाला मान्यता दिली असून, एक ते दोन महिन्यांत त्याची अंमलबजावणी सुरू होईल, असे मंत्री विखे-पाटील यांनी सांगितले.
...तर पुण्याचे पाणी कमी करणार: विखे पाटील यांचा इशारा
पुणे महापालिकेला शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी 16 टीएमसी इतका कोटा मंजूर आहे. मात्र, महापालिका 22 ते 23 टीएमसी पाणी उचलते. जेवढे पाणी महापालिका घेते, त्या प्रमाणात त्यावर पुनर्प्रक्रिया करून ते शेतीसाठी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. मात्र, महापालिकेकडे अशी यंत्रणा नाही, त्यामुळे पाण्यावर प्रक्रिया न केल्यास पुण्याचे तेवढे पाणी कमी करणार असल्याचा इशारा मंत्री विखे पाटील यांनी विधानसभेत दिला.