पुणे: खडकवासला धरणातून सोमवारी (दि. ३) २९ हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यामुळे सिंहगड रस्त्यावरील एकतानगर भागातील दोन सोसायट्यांमध्ये पाणी शिरले. जलपूजन आणि द्वारका अशी पाणी शिरलेल्या सोसायट्यांची नावे आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून महापालिका प्रशासन मदतीसाठी घटनास्थळी तत्पर असल्याचे पाहायला मिळाले.
शुक्रवारी (दि. ३१) धरणातून तब्बल ४५ हजार क्युसेक वेगाने विसर्ग करण्यात आला होता. त्यावेळी एकतानगर भागात कमरेइतके पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती. त्या प्रसंगी महापालिकेने तातडीने मदत पुरवून अग्निशमन दलाच्या साहाय्याने अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले होते.
त्या तुलनेत सोमवारी पाण्याचा विसर्ग २९ हजार क्युसेकपर्यंत मर्यादित राहिल्याने पाण्याचा वेढा फक्त दोन सोसायट्यांपर्यंतच सीमित राहिला. सोमवारी धरणातून विसर्ग सुरू करण्यापूर्वीच महापालिकेच्या स्थानिक क्षेत्रीय कार्यालयाचे सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते.
संभाव्य धोका ओळखून अधिकाऱ्यांनी नागरिकांना वेळीच सुरक्षित स्थळी आणि घराबाहेर पडण्याचे आवाहन केले. खबरदारी म्हणून पालिका यंत्रणेचे कर्मचारी परिसरात तैनात ठेवण्यात आले होते. मुसळधार पावसामुळे आणि धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे एकतानगर परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण कायम आहे.