खडकवासला : पावसाचा जोर मंगळवारपासून ओसरला. बुधवारी (दि. 30) श्रावणसरींचा अपवाद वगळता पानशेत-वरसगाव धरणक्षेत्रात रिमझिम सुरू आहे. त्यामुळे पाण्याची आवक दुपारपासून कमी झाल्याने खडकवासला धरणातून मुठा नदीच्या पात्रातील विसर्ग सायंकाळी सहा वाजता 8 हजार 525 क्युसेकपर्यंत कमी करण्यात आला. मुठा नदीच्या पूरनियंत्रणासाठी वरसगाव, पानशेतसह खडकवासलातील पाण्याची पातळी कमी केल्याने बुधवारी सायंकाळी पाच वाजता खडकवासला धरणसाखळीत 25.53 टीएमसी म्हणजे 87.59 टक्के साठा झाला होता. (Pune News Update)
गेल्या चार दिवसांत खडकवासलातून धरणाच्या क्षमतेच्या तीनपट म्हणजे जवळपास साडेपाच टीएमसी जादा पाणी मुठा नदीत सोडण्यात आले आहे. चारही धरण क्षेत्रातील पावसाचा जोर ओसरल्याने खडकवासला धरणाचा विसर्ग मंगळवारी (दि.29) कमी करण्यात आला. मंगळवारी दुपारी दोनपासून बुधवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत खडकवासलातून मुठा नदीत 17 हजार 974 क्यूसेक वेगाने पाणी सोडले जात होते. पावसाचा जोर ओसरला असला तरी पानशेत, वरसगाव धरण क्षेत्रातील रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील घाटमाथ्यावर पावसाळी वातावरण कायम आहे. त्यामुळे अचानक जादा पाऊस पडल्यास जादा विसर्गामुळे मुठा नदीला पूर येऊ नये, यासाठी खडकवासलाची पाणी पातळी 60.87 टक्क्यांपर्यंत तर वरसगावची 88.55 व पानशेतची पातळी 89.25 टक्क्यांपर्यंत कमी केली आहे.
खडकवासला जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता मोहन भदाणे म्हणाले, मुठा नदीची पुर स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी खडकवासा धरण साखळीची पाणी पातळी कमी केली जात आहे. दोन दिवसां पासून धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. पाण्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे आज सायंकाळी खडकवासलाचा कमी केला आहे. पावसाचे प्रमाण वाढल्यास पुन्हा जादा पाणी मुठा नदीत सोडण्यात येणार आहे.
रविवारी (दि.28) सकाळी सहा वाजेपर्यंत खडकवासला धरणातून मुठा नदीत 5.57 टीएमसी जादा पाणी सोडले होते. धरण क्षेत्रातील मुसळधार पावसामुळे रविवारपासून बुधवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत 5.15 टीएमसी पाणी खडकवासलातून मुठा नदीत सोडण्यात आले. यंदाच्या पावसाळ्यात आजपर्यंत खडकवासलातून 10.72 टीएमसी मुठा नदीत सोडले आहे. खडकवासला धरणाची पाणी साठवण क्षमता 1.97 टीएमसी आहे. खडकवासला सिंहगड भागात तुरळक पाऊस पडत आहे. मात्र, पानशेत- वरसगाव धरण खोर्यासह रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील घाट माथ्यावर अधुनमधून श्रावण सरी कोसळत आहेत. सायंकाळी सहापासून या परिसरात पुन्हा पावसाची रिपरिप सुरू झाली. सध्या वरसगावमधून 5711, पानशेतमधून 6288 व टेमघरमधून 300 क्यूसेक पाणी खडकवासलात सोडले जात आहे. बुधवारी दिवसभरात टेमघरमध्ये 4, वरसगावमध्ये 3, पानशेतमध्ये 3 मिलीमीटर पाऊस पडला. तर खडकवासला येथे पावसाची नोंद झाली नाही.
एकूण पाणी साठवणक्षमता
29.15 टीएमसी
पाणीसाठा
25.53 टीएमसी
(87.59 टक्के)