Katraj Ghat Wall Collapse Pudhari
पुणे

Katraj Ghat Wall Collapse Negligence: कात्रज घाटात संरक्षक भिंती ढासळल्या; नागरिकांचा जीव धोक्यात

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणावर संताप; अपघाताची भीती वाढली

पुढारी वृत्तसेवा

कात्रज: स्वारगेट-सातारा महामार्गावरील जुन्या कात्रज घाटात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे. घाटातील अनेक ठिकाणच्या संरक्षक भिंती पूर्णपणे ढासळलेल्या अवस्थेत असून, गेल्या अनेक महिन्यांपासून हा गंभीर प्रश्न प्रलंबित आहे. मात्र, संबंधित विभागाकडून केवळ पाहणी केली गेली असून, प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.

पावसाळा तोंडावर आला असताना घाटातील ही धोकादायक परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. मुसळधार पावसामुळे ढासळलेल्या भागात भूस्खलन किंवा वाहन दरीत कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीही प्रशासनाने या प्रश्नाकडे काणाडोळा केल्याने नागरिकांमध्ये तीव संताप व्यक्त होत आहे.

मांगडेवाडीच्या पुढे हॉटेल माऊली, हॉटेल हवेली आणि के-72 या परिसरात रस्त्यालगतच्या संरक्षक भिंती कोसळल्या आहेत. या ठिकाणी नैसर्गिक ओढा, खोल दरी असून, एखादे वाहन नियंत्रण सुटल्यास थेट दरीत कोसळण्याचा धोका आहे. विशेषतः रात्री प्रकाशाची अपुरी व्यवस्था आणि ढासळलेले कठडे, यामुळे अपघाताची शक्यता अधिक वाढली आहे.

केवळ भिंतीच नव्हे, घाटातील सर्वच यंत्रणा कोलमडल्याचे विदारक चित्र दिसत आहे. कात्रज घाटातील पावसाळी पाणी वाहून नेणारी गटारे, दिशादर्शक फलक, इशारा फलक, रस्त्याकडील सुरक्षा भिंतींची रंगरंगोटी आणि इतर सुरक्षाविषयक उपाययोजना गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित आहेत. त्यामुळे घाटातील वाहनचालकांचे जीव धोक्यात आले असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

पावसाळा सुरू होण्यापूर्वीच संरक्षक भिंतींचे काम युद्धपातळीवर पूर्ण करणे आवश्यक असताना सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र कुंभकर्णी झोपेत असल्याची टीका नागरिक करीत आहेत. एखादी मोठी दुर्घटना घडून निष्पाप नागरिकांचा बळी गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? असा संतप्त सवाल परिसरातून उपस्थित केला जात आहे.

तक्रारी, पाहणी आणि आश्वासने; पण काम शून्य!

स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी वारंवार तक्रारी करूनही विभागाचे अधिकारी केवळ पाहणी करून परतले. ‌‘काम तातडीने सुरू करू,‌’ अशी आश्वासने देण्यात आली. मात्र, दोन महिन्यांहून अधिक काळ उलटूनही एकही वीट हललेली नाही. अधिकाऱ्यांच्या या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांचा संयम संपत चालला आहे. विशेष म्हणजे, या गंभीर प्रश्नाबाबत कनिष्ठ अभियंता, उपअभियंता आणि कार्यकारी अभियंता यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला असता त्यांनी फोनही उचलला नाही. त्यामुळे प्रशासनाच्या जबाबदारीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कात्रज घाटातील अनेक हॉटेल्स परिसरातील संरक्षक भिंती पूर्णपणे ढासळल्या आहेत. खाली खोल दरी असल्याने मोठा अपघात होण्याचा धोका आहे. यापूर्वीही येथे अनेक अपघात घडले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांची उदासीनता पाहता अपघात झाल्यावरच प्रशासनाला जाग येणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
काशिनाथ काशिद, माजी सरपंच, भिलारेवाडी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT