सुरेश वाणी
नारायणगाव: जुन्नर तालुक्यातीस आठ जिल्हा परिषद गट आणि 16 पंचायत समिती गणांमध्ये बर्याच गावांचा फेरबदल झाल्याने इच्छुक मंडळींचा हिरमोड झाला आहे. प्रत्यक्षात आरक्षण जाहीर झाल्यावर इच्छुक मंडळींकडून मोर्चेबांधणी सुरू होणार आहे. दरम्यान, महायुती व महाविकास आघाडी एकत्रित लढतात, की ‘एकला चलो रे’ असा निर्णय घेतात, यावर लढतींचे चित्र अवलंबून आहे.
दरम्यान, जुन्नर तालुक्यात सध्या सर्वच पक्ष स्वतंत्र लढण्याच्या तयारीत आहेत. तशा पद्धतीने रणनीती आखली जात आहे. कोणता गट व गण आरक्षणात कोणत्या प्रवर्गाला जातो? यावरसुद्धा बरीच गणिते अवलंबून आहेत. (Latest Pune News)
जुन्नर तालुक्यात मागील वेळी 7 जिल्हा परिषदेचे गट होते, तर 14 गण होते. या वेळी जिल्हा परिषदेचा एक गट व पंचायत समितीचे दोन गण वाढले आहेत. त्यामुळे काही गावांची अदलाबदल झाल्याने काही इच्छुक मंडळींना फटका बसणार आहे.
डिंगोरे - उदापूर गट : या गटामध्ये उदापूर, पिंपळगाव जोगा, अहिनेवाडी, मंदारणे, आंबेगव्हाण, चिल्हेवाडी, मांडवे, कोपरे, सांगणारे, खुबी,पारगाव तर्फे मढ, तळेरान डिंगोरे नेटवर्क, बल्लाळवाडी आमले पांगरी तर्फे मढ, मढ, सीतीवाडी, गोळेगाव, अलदरे या गावांचा समावेश आहे. मागील निवडणुकीत अंकुश आमले विजयी झाले होते.
ओतूर - धालेवाडी तर्फे हवेली : ओतूर, रोहोकडी, डुंबरवाडी, खामुंडी, धालेवाडी तर्फे हवेली, धोलवड, ठिकेकरवाडी, हिवरे खुर्द, हिवरे बुद्रुक, भोरवाडी, विघ्नहरनगर, ओझर, तेजेवाडी, शिरोली खुर्द, कुमशेत, शिरोली बुद्रुक या गावांचा समावेश आहे. या गटामध्ये मागच्या वेळी मोहित ढमाले विजयी झाले होते. शिरोली बुद्रुक, शिरोली खुर्द, तेजेवाडी, धालेवाडी ही गावे नव्याने या गटामध्ये समाविष्ट झाली आहेत.
आळे- पिंपळवंडी : पिंपळवंडी, काळवाडी, उंब्रज क्रं. 1, उंब्रज क्रं. 2, पिंपरी पेंढार, आळे, वडगाव आनंद,संतवाडी, कोळवाडी या गावांचा समावेश आहे या गटामध्ये मागील वेळी शरद लेंडे अवघे एकमताने विजय झाले होते. शिवसेनेचे मंगेश काकडे यांचा या गटातून एक मताने पराभव झाला होता. तसेच आमदार शरद सोनवणे यांचे बंधू शशी सोनवणे यांचाही पराभव झाला होता. या गटामध्ये नेताजी डोके अथवा त्यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्य नयना डोके उभ्या राहू शकतात.
राजुरी- बेल्हे : या गटामध्ये राजुरी, उंच खडक, गुळुंचवाडी, नळावणे, आणे,पेमदारा, शिंदेवाडी, बेल्हे,गुंजाळवाडी,बांगरवाडी, तांबेवाडी, रानमळा,साकोरी तर्फे बेल्हे,मंगरूळ, व झाप या गावांचा समावेश असून मागील वेळी या गटामधून पांडुरंग पवार विजय झाले होते. सध्या या गटामधून अनेक जण इच्छुक आहेत.
बोरी - खोडद : जुन्नर तालुक्यामध्ये हा गट नव्याने तयार करण्यात आला असून या गटात या अगोदरच्या आजूबाजूच्या गटातील काही गावांचा समावेश करण्यात आला आहे. या गटामध्ये बोरी बुद्रुक, जाधववाडी,निमगाव सावा, औरंगपूर,पारगाव तर्फे आळे, शिरोली तर्फे आळे, सुलतानपूर, पिंपरी कावळ, खोडद,कांदळी, वडगाव कांदळी, बोरी खुर्द, येडगाव या गावांचा समावेश आहे. मागच्या निवडणुकीमध्ये येडगाव हे नारायणगाव -वारूळ वाडी गटामध्ये होते. या गटातून पांडुरंग पवार यांच्या नावाची चर्चा आहे. तसेच बाळासाहेब बढे यांचीही शक्यता आहे.
नारायणगाव वारूळवाडी : या गटामध्ये मागच्या वेळेला आशा बुचके विजयी झाल्या होत्या त्यांनी राजश्री बोरकर यांचा पराभव केला होता . सध्या या गटामध्ये इच्छुकांची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे. यामध्ये भाजपचे तालुका अध्यक्ष संतोष खैरे, नारायणगावचे उपसरपंच बाबू पाटे, सुजित खैरे, माऊली खंडागळे, महेश शेळके, प्रियंका शेळके व आशा बुचके या नावांचा समावेश आहे. या गटामध्ये नारायणगाव, धनगरवाडी वारूळवाडी,गुंजाळवाडी, मांजरवाडी, हिवरे तर्फे नारायणगाव एवढ्याच गावांचा समावेश आहे.
सावरगाव,- कुसुर : या गटामध्ये काही गावांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. या अगोदर या गटामधून गुलाब पारखे विजय झाले होते. या वेळेला या गटातून भाजपाच्या आशा बुचके, गुलाब पारखे, अरुण पारखे, संतोष चव्हाण यांच्या नावाची चर्चा आहे. या गटात सावरगाव, निमदरी, खिल्लारवाडी, आगर, धामणखेल, खानापूर, बस्ती, निमगाव तर्फे महाळुंगे, वडगाव सहानी, पिंपळगाव तर्फे नारायणगाव कुरण, आर्वी, कुसुर, निरगुडे, सोमतवाडी खानगाव, येणेरे, विठ्ठलवाडी, काले,दातखीळवाडी, बुचकेवाडी, पारुंडे, विठ्ठलवाडी, काटडे, वडज, व चिंचोली या गावांचा समावेश आहे.
बारव- तांबे : हा गट मागच्या वेळेला तांबे पाडळी या नावाने ओळखला जात होता. मागील वेळेला या गटामधून देवराम लांडे यांनी जिल्हा परिषदेचे नेतृत्व केले होते. यंदा दत्ता गवारी या गटातून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजिंक्य घोलप अथवा त्यांची पत्नी नीलम घोलप उभ्या राहू शकतात. तसेच या गटामधून देवराम लांडे यांच्या सून माई लांडे यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो. पाडळी, पिंपळगाव सिद्धनाथ, माणिकडोह, खामगाव, गोद्रे, हडसर,राजूर, उंडेखडक, निमगिरी, खटकाळे, केवाडी, जळवंडी देवळे, अजनावळे, तांबे, बेलसर, सुराळे, तेजुर, चावंड, आपटाळे, पूर, घाटघर, बॉतार्डे, हिवरे तर्फे मिन्हेर, राळेगण, शिंदे, वानेवाडी, धालेवाडी तर्फे मिन्हेर, सोनावळे, घंगाळदरे, सुकाळवेढे, इंगळून उच्चील, आंबोली, भिवाडे बुद्रुक, भिवाडे खुर्द,आंबे, आणि हातवीज. या गावांचा या गटामध्ये समावेश आहे.
राज्यात असलेली महायुती, महाविकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत होईलच असे नाही. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाच्या स्थानिक नेत्यांची ’एकला चलो रे’ अशी भूमिका असल्याचे सध्या तरी पाहायला मिळत आहे.