टाकळी भीमा: निवडणूक म्हटले, की उमेदवाराकडून जेवणावेळी आल्याच. जिल्हा परिषदेसाठी उमेदवाराला निवडणूक खर्चाची एकूण मर्यादा 9 लाख, तर पंचायत समितीच्या उमेदवारासाठी 6 लाख रुपये दिलेली होती. यामध्ये विविध प्रकारचे खर्च दाखवायचे झाल्यास ताळेबंद पाहणाऱ्याच्या नाकी नऊ येणार आहे, हे नक्की. एक उमेदवार निवडणुकीत किती लोकांना जेवण देतो आणि किती थाळ्या दाखविल्या जाणार, हा निवडणूक आयोगासाठी संशोधनाचा विषय आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समित्या निवडणुकीची धामधूम संपली असून, निवडणूक आयोगाने निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या गाड्या, स्पीकर, जेवण, चहा, नाष्टा, बॅनर, झेंडा, गळ्यातील उपरणे, यासाठी दरसूची दिलेली आहे. टपरीवरील चहा-कॉफी आणि ढाब्यावरील थाळीचे दर गृहीत धरले आहेत. शाकाहारी थाळीसाठी 80, स्पेशल थाळी 120, मांसाहारी थाळीमध्ये अंडाकरी 120, चिकन 150, मटण 200, मच्छी 200, साधा चहा 7 रुपये, स्पेशल चहा 15 रुपये, शिरा तसेच पोहे आणि उपीट 15 रुपये, मिसळ 40 रुपये, पाणी बॉटल 20 रुपये आणि शीतपेये 20 रुपये असा दर निश्चित केला आहे.
मंडप, टेबल, खुर्ची, पाणी आणि उमेदवारांच्या खर्चात मंडप, लाकडी स्टेज 20 रुपये प्रतिचौरस फूट, शोभा कमान 2 हजार 500 रुपये, लोखंडी, लाकडी, प्लास्टिक खुर्च्या 6 ते 10 रुपये, सोफासेट 500 रुपये, टेबल 250 रुपये, गादी 60 रुपये, लोड 40 रुपये, पाणी जार 20 रुपये, काचेचे ग्लास 6 रुपये, फॅनसाठी 200 ते 350 रुपये असे विविध प्रकारच्या खर्चाचे दर निवडणूक यंत्रणेने निश्चित केले आहेत.
विशेष म्हणजे, सध्या नारळाचे दर 30 रुपयांपेक्षा अधिक आहेत; मात्र निवडणूक यंत्रणेने प्रतिनग नारळ 30 रुपये, अशी दरसूची केली आहे. पुष्पगुच्छासाठी 100 ते 300 रुपये, हार 100 ते 200 रुपये, फटाक्यांची माळ 250 ते 800 रुपये, अशी ही दरसूची करण्यात आली आहे.
उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यापासून त्यांच्या खर्चाचे मीटर सुरू झाले होते. उमेदवारांना होणाऱ्या खर्चासाठी स्वतंत्र बँक खाते काढावे लागले, तर नियमित खर्च उमेदवारी अर्ज भरल्यापासून निकाल लागेपर्यंचा सर्व झालेला खर्च सादर करावा लागणार आहे. यासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. यामध्ये मर्यादेपेक्षा जास्त खर्च झाल्यास कारवाई होणार असल्याचे सांगण्यात येते. असे असताना आलेला खर्च तपासणे आणि देणार्यांनी तो त्या ताळेबंदातच द्यावा लागणार असल्याने दोन्हीकडील डोकेदुखी वाढली आहे.