Cargo Flights Pudhari
पुणे

Iran Israel War Vegetable Export: इराण-इस्त्रायल युद्धामुळे मुंबईहून शेतमालाची निर्यात ठप्प; शेतकऱ्यांना आर्थिक फटका

दररोज 400–500 टन शेतमालाची निर्यात रद्द, युरोप व आखाती देशांमध्ये यामुळे अडचणी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: इराण आणि इस्त्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे मुंबईहून विमान वाहतुकीद्वारे होणारी शेतमालाची आखाती देशातील निर्यात ठप्प झाली आहे. विमान वाहतूक बंदमुळे आखातात मुंबईतून दररोज होणाऱ्या 400 ते 500 टनाइतक्या शेतमालाची निर्यात रविवारी होऊ शकली नसून ती पुढेही बंद राहण्यामुळे शेतकऱ्यांना आणि निर्यातदारांनाही याचा मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तर, युरोपातील विमान उड्डाणांवरही मर्यादा आल्याने तेथेही राज्यातून होणारी शेतमाल निर्यात मंदावल्याची माहिती पणन विभागाच्या सूत्रांकडून मिळाली.

भारताला जवळ असणाऱ्या प्रमुख देशांमध्ये आखाती देशांचा समावेश होतो. या बाबत राज्य कृषी पणन मंडळाच्या सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार मुंबईप्रमाणेच बंगळूरू, दिल्ली येथूनही शेतमालाची निर्यात होते. मुंबईतून आखाती देशात रोजचा चारशे ते पाचशे टनाइतका शेतमाल निर्यात होतो. त्यामध्ये भेंडी, हिरवी मिरची, गवार, शेवगा, दुधी भोपळा, पालेभाज्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर पेरू, चिक्कू, द्राक्षांची निर्यात होते. आंब्यांची तुरळक निर्यातही सुरू झाली होती.

विमान उड्डाणे रद्दमुळे आखाती देशातील निर्यातीला सध्यातरी बेक लागला आहे. मात्र, समुद्रमार्गे होणारी शेतमाल निर्यात तूर्तास सुरू आहे. दरम्यान, निर्यातक्षम मालाची निर्यात बंद होण्यामुळे देशांतर्गत बाजारातच असा शेतमाल विक्री करावा लागू शकतो. त्यामुळे दरावर किंचित परिणाम होण्याचाअंदाजही वर्तविण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाचे माजी अध्यक्ष अशोक गायकवाड (नाशिक) म्हणाले, चालूवर्षी द्राक्ष उत्पादन गतवर्षापेक्षा कमी आहे. दरवर्षी मार्चच्या पहिल्या आठवड्यात तीन ते चार हजार कंटेनरइतकी द्राक्ष निर्यात होत असते. यंदा ती अकराशे कंटनेरच्या आसपास झाल्याचे दिसून येते. सुएझ कालव्याद्वारे द्राक्ष निर्यात सुरु राहिल्यास अडचण येणार नाही. मात्र, युध्दामुळे तो मार्ग बंद झाल्यास पुढे द्रक्षिण अफिकेतील केपटाऊनमार्गे जहाजे वळवावे लागतील. त्यामुळे भाडेवाढ होऊन निर्यातीला प्रश्न निर्माण होऊ शकतो. दरम्यान, केंद्र सरकारच्या ग््रेापनेट या ऑनलाईन प्रणालीवरील माहितीनुसार देशातून 1099 कंटेनरइतकी म्हणजे सुमारे 14 हजार 630 मेट्रिक टनाइतकी द्राक्ष निर्यात पूर्ण झालेली आहे. ती प्रामुख्याने नेदरलँडस, जर्मनी, इंग्लड, बेल्जियम, नॉर्वे, स्पेन आदी देशांचा समावेश आहे.

मुंबईतून आखाती देशात होणारी शेतमालाची निर्यात युध्दजन्य स्थितीमुळे शंभर टक्के बंद झाली आहे. मात्र, काही एअरलाईन्स युरोपला सुरू असल्याने शेतमाल निर्यात होत असली तरी प्रमाण कमी आहे. कारण आखाती देशांहून पुढे जाणारी विमान वाहतूक बंदसारखीच आहे. अन्य मार्गाने विमाने जात असून इंधन अधिक भरावे लागत असल्याने निर्यातीसाठी शेतमालाची निर्यात नगण्य होत आहे. यापूर्वी युरोपला रोजचा 50 ते 100 टनाइतका शेतमाल निर्यात होत होता. मात्र, तो आता 20 ते 25 टनापर्यंत खाली आला आहे.
कौशल खक्कर, मुख्य कार्यकारी अधिकारी, के.बी. एक्सपोर्ट, वाशी-मुंबई

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT