पुणे: क्रिकेटच्या मैदानावर भारताने न्यूझीलंडला धूळ चारली आणि पुण्यातल्या फर्ग्युसन रस्त्यावर विजयाचा जल्लोष झाला. रविवारी (दि. 8) रात्री भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 विश्वचषकाच्या रोमहर्षक अंतिम सामन्यात भारताने विजय मिळवताच विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर उत्साहाचे उधाण पाहायला मिळाले. हाती भारताचा तिरंगा घेतलेल्या तरुणाईने, असंख्य क्रिकेटप्रेमींनी एकत्र येत, फर्ग्युसन रस्त्यावर विजयाचा जल्लोष साजरा केला. या वेळी प्रचंड गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले.
सामना संपल्याच्या काही मिनिटांतच कोथरूड, डेक्कन, मध्यवस्ती, उपनगरांतून आणि शिवाजीनगर भागातून तरुणाई दुचाकीवरून फर्ग्युसन रस्त्याच्या दिशेने आले. फर्ग्युसन रस्त्यावरील काही इमारतींमधील नागरिकही हातात भारताचा तिरंगा, अंगात टीम इंडियाची जर्सी घेऊन उतरले. सर्वांच्या चेहऱ्यावर विजयाचा आनंद होता. भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणांनी फर्ग्युसन रस्ता दणाणून गेला होता. अनेक ठिकाणी तरुणांनी या जयघोषाच्या गजरात ठेका धरला, तर काहींनी फटाक्यांची आतषबाजी करत आनंद व्यक्त केला.
सोशल मीडियावरही या जल्लोषाचे व्हिडिओ तुफान व्हायरल करण्यात येत होते. तसेच, शहरात काही ठिकाणी मंडळांच्या वतीने चौकात प्रोजेक्टरवर आणि मोठ्या एलईडी स्क्रीन लावून हा सामना दाखवला जात होता. दरम्यान, पुणेकरांनी फर्ग्युसन रस्त्यावर केलेल्या गर्दीमुळे फर्ग्युसन रस्त्यासह जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता, शास्त्री रस्ता, छत्रपती संभाजी महाराज पुतळा चौक, प्रभात रस्ता संपूर्णपणे वाहतूक कोंडीने जाम झाला होता. फटाक्यांची आतषबाजी, हलगीचा आवाज, तरुणाईचा जयघोष अशा वातावरणाने संपूर्ण फर्ग्युसन रस्ता दणाणून गेला होता.
रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने आणि सामन्याचा निकाल भारताच्या बाजूने लागल्याने गर्दी वाढण्याची शक्यता पुणे पोलिसांनी अगोदरच बंदोबस्त ठेवला होता. त्यानुसार पोलिसांच्या वतीने फर्ग्युसन रस्ता आणि परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वाहतुकीची कोंडी होऊ नये आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पथके तैनात करण्यात आली होती. पोलिसांनी या वेळी अतिउत्साही तरुणांना शिस्त पाळण्याचे आवाहन केले.
नाद घुमला विजयाचा!
ढोल- ताशांच्या गजराने पुण्याच्या आसमंताला गवसणी घातली होती. पुण्याच्या प्रसिद्ध पथकांनी लावलेला तो ठेका आणि त्यावर थिरकणारी पावले पाहून स्वर्गातील गंधर्वही थक्क झाले असते. फटाक्यांच्या आतषबाजीने काळोख्या रात्रीलाही दिवसाच्या प्रकाशाचे लेणे चढवले होते. आकाशामध्ये फुटणारे ते रंगीबेरंगी कारंजे जणू भारतीय खेळाडूंच्या कर्तृत्वाच्या छटा साऱ्या जगाला दाखवत होत्या.
आनंदाश्रूंचा अभिषेक
फक्त तरुणच नव्हे, तर आबालवृद्धांच्या डोळ्यांतून आनंदाश्रूंच्या धारा वाहत होत्या. ही केवळ क्रिकेटची जीत नव्हती, तर 140 कोटी भारतीयांच्या विश्वासाचा विजय होता. पेढ्यांच्या रूपाने प्रत्येक तोंडात गोडवा विरघळत होता. भारतमातेच्या जयघोषाने सह्याद्रीच्या कडांमधून जणू प्रतिध्वनी उमटत होता.