इंदापूर: संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग अपूर्ण असल्याने प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि. 15) केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी पालखी महामार्गाची पाहणी करीत तो लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
सोलापूरहून शुक्रवारी सकाळी हेलिकॉप्टरने आल्यानंतर इंदापुरात त्यांचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, भाजपचे नेते प्रदीप गारटकर, प्रवीण माने आदींनी स्वागत केले. त्यानंतर बसमधून गडकरी यांच्या समवेत सर्वांनी एकत्र प्रवास करीत महामार्गाची पाहणी केली.
दरम्यान, वेताळ मंदिराजवळील अर्धवट उड्डाणपूल पूर्ण करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. महामार्गावरील सोनाई दूध संघास त्यांनी भेट दिली. निमगाव केतकीत वाहनांचा ताफा आल्यानंतर व्यापारी गावकऱ्यांनी गडकरी यांचा सत्कार केला. रस्त्याचे काम लवकरच पूर्ण होईल, अशा शब्दांत त्यांनी गावकऱ्यांना आश्वासित केले.
गोतोंडी, शेळगाव, अंथुरणे, जंक्शन, लासुर्णे, बेलवाडी, सणसर, भवानीनगरपर्यंत त्यांनी पाहणी केली. नितीन गडकरी यांच्या आजच्या पाहणी दौऱ्यामुळे हा महामार्ग येत्या काळात लवकरच पूर्ण होऊन वैष्णवभक्तांसह नागरिक, प्रवाशांचा प्रवास विनाविलंब सुखकर होईल, अशी आस आता सर्वांना लागली आहे.
भवानीनगर येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या कामाबाबत तांत्रिक बाबी तपासून निर्णय घेण्यात येतील, असे केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी पाहणीदरम्यान स्पष्ट केले.