Campus to Career Pudhari
पुणे

Campus to Career: इंदापूरमध्ये ‘पुढारी कॅम्पस टू करिअर’ उपक्रम; विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअरबाबत मार्गदर्शन

एआय, रोबोटिक्स आणि नव्या शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी दूरदृष्टी ठेवून करिअर निवडावे, असे तज्ज्ञांचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

इंदापूर: सध्याच्या स्पर्धेच्या आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगात विद्यार्थ्यांनी बारावीनंतर फक्त प्रवेश न घेता करिअरचा दूरदृष्टिकोन ठेवला पाहिजे. आधुनिकतेच्या युगात व भविष्याचा विचार करून विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी, कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, डिजिटल तंत्रज्ञान यांसह विविध उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये करिअरच्या संधी पाहाव्यात. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे बहु-विषयक शिक्षणाच्या संधी वाढल्या असून, भविष्याची वाटचाल पाहून विद्यार्थी व पालकांनी करिअरचा निर्णय घ्यावा, असे आवाहन ‘पुढारी’ माध्यम समूहातर्फे इंदापुरात आयोजित ‘पुढारी कॅम्पस टू करिअर’ उपक्रमात शिक्षणतज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

इंदापूर येथील गुरुकृपा सांस्कृतिक भवनात सोमवारी (दि. २१) 'पुढारी' समूहाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'पुढारी कॅम्पस टू करिअर' या करिअर मार्गदर्शन सेमिनारमध्ये विविध विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. यावेळी इंदापूर तालुक्यासह आसपासच्या ग्रामीण भागातील विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि पालक वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहून 'पुढारी'च्या या शैक्षणिक उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या सेमिनारची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली. तज्ज्ञ मान्यवरांचे स्वागत 'पुढारी' माध्यम समूहातर्फे करण्यात आले. यावेळी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी पुण्याचे विश्वकर्मा विद्यापीठाचे प्रा. डॉ. मकरंद पुरी, पिंपरी-चिंचवड विद्यापीठाचे संचालक प्रा. डॉ. रामदास बिरादार, डिजिटल रोबोटिक्सचे प्रा. राज जाधव, पिंपरी-चिंचवड विद्यापीठाचे प्रा. डॉ. शेखर राहाणे, पिंपरी-चिंचवड विद्यापीठाचे प्रा. डॉ. श्रीनिवास श्रीखंडे, एस. बी. पाटील शैक्षणिक संकुलाचे प्रा. डॉ. प्रदीप बोडके यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश चिंचकर यांनी केले.

प्रा. डॉ. मकरंद पुरी, विश्वकर्मा विद्यापीठ, पुणे

आजच्या स्पर्धेच्या युगात फक्त 'माहिती' असून चालत नाही. आपल्याकडील ज्ञानाचा आणि कौशल्याचा योग्य वापर करणे ही काळाची गरज बनली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी हे ओळखून भविष्यात यशस्वी होण्यासाठी योग्य नियोजन करून करिअरची संधी निवडण्यासाठी अभियांत्रिकी, मेडिकल, डिझायनिंग, डिजिटल ब्रॅण्डिंग, ह्यूमन रिसोर्स, विधी, जर्नालिझम, मीडिया, कला, विज्ञान, वाणिज्य अशा विविध क्षेत्रांत अभ्यास करणे गरजेचे असून, त्यामधून उत्तमरीत्या करिअर घडवता येते.

प्रा. डॉ. रामदास बिरादार, पिंपरी-चिंचवड विद्यापीठ

पिंपरी-चिंचवड एज्युकेशन सोसायटी अर्थात विद्यापीठाचे संस्थापक कर्मयोगी शंकररावजी पाटील व विद्यापीठाचे कुलपती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यामुळे इंदापूरला येण्याचे मी आवर्जून ठरवले. ग्रामीण भागातील बारावीनंतरच्या विद्यार्थ्यांना करिअरची सुरुवात करण्यासाठी दैनिक 'पुढारी'च्या शैक्षणिक उपक्रमात मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली.

विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी आपले भविष्य उज्ज्वल करण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही. शिक्षणात पर्याय न शोधता शॉर्टकट मार्गाने कधीही जाऊ नका. जे काही बनायचे आहे ते कष्टाने बनवण्याचा प्रयत्न करा. आत्मविश्वास ठेवून 'आम्ही ग्रामीण भागातील आहोत' याला महत्त्व देऊ नका. कुठून शिकतोय, किती प्रामाणिक आहोत हे मनापासून केले, तर यश निश्चित मिळेल. चांगल्या शिक्षकांची फळी आणि होतकरू विद्यार्थी असतील तर उत्तम फळ मिळते. आपल्या सोबतचे मित्र आपल्यापेक्षा पुढे गेले म्हणून दुःख करू नका, त्यापेक्षा आनंद माना. उत्तुंग यश गाठणारे, टॉपरमध्ये आलेले विद्यार्थी देखील साधेच असतात. त्यांच्याशी स्पर्धा करू नका, ते काय करतात ते शिकून घेण्याचा प्रयत्न करा. गुण कमी-जास्त पडले म्हणून वाईट वाटून घेऊ नका. आपल्यातील मत्सर हा भाग काढून टाकून 'आपणही चांगले गुण मिळवू' हा दृष्टिकोन ठेवून आनंदी राहिलात तरच यशस्वी व्हाल. प्रत्येकानेच पुण्यात शिक्षण घेण्याचा विचार करताना आपली कौटुंबिक परिस्थिती पाहून आपल्याच भागातील इंदापूर, बारामती, सोलापूर, पंढरपूर या ठिकाणी कमी फी व चांगले शिक्षण असलेल्या संस्थांमध्ये प्रवेश घेऊन, आपल्या अभ्यासाशी प्रामाणिक राहून रात्रंदिवस कष्ट करण्याची तयारी ठेवत प्रामाणिकपणे यश संपादन करा. विद्यार्थ्यांनी शिक्षण घेताना सुट्ट्या घेऊन गावी येण्यापेक्षा आपल्या पालकांनाच आपल्याला भेटण्यासाठी महाविद्यालयात बोलवा, यामुळे आपला निकाल चांगला लागेल, आपली क्षमता वाढेल आणि आपलं कुटुंब आनंदी राहील. कर्मयोगी शंकररावजी पाटील यांनी मराठवाड्यातील उमरगा येथील महाविद्यालय निगडी येथे स्थानांतरित केले. त्याचे रूपांतर आज पुण्यातील महाविद्यालय-विद्यापीठांमध्ये झाले असून, ते प्रथम पाच शैक्षणिक विद्यापीठांमध्ये आज नावाजले जाते.

प्रा. राज जाधव, डिजिटल रोबोटिक्स

शिक्षणातून करिअर घडवत असताना अनेक क्षेत्रांत संधी आहेत. त्यामध्ये कम्युनिकेशन स्किल, बेसिक स्किल, यशस्वी उद्योजकता प्रशिक्षणासाठी एआय व रोबोटिक्सवर आम्ही काम करतो. स्पर्धेच्या युगात उत्तम करिअर करण्यासाठी अभियांत्रिकीमध्ये सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स तसेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यामधील आपल्या क्षमतेनुसार शाखा निवड करून नामवंत विद्यापीठासह महाविद्यालयात प्रवेश घेऊन यशस्वी उद्योजक होण्यासाठी आम्ही मदत करतो. आपला देश शेतीप्रधान असल्याने पूर्वी शेतीवर आधारित उपजीविका केली जात होती. पुढे औद्योगिक क्रांतीनंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे युग आले. आता सध्या एआय सुरू असून, रोबोटिक्समध्ये विकास होत आहे. प्रगत तंत्रज्ञान शिकून यशस्वी व्हावे.

विद्यार्थ्यांनी 'RICH' होऊन काम करावे. 'R' म्हणजे रिलेशनशिप नेटवर्क स्ट्रॉंग ठेवणे. 'I' म्हणजे इन्कम सोर्स महत्त्वाचा आहे. त्यासाठी 'C' म्हणजे कॅरॅक्टर चांगले ठेवणे, चांगल्या मित्रांच्या संपर्कात राहणे, नवीन शिकण्याचा प्रयत्न करणे आणि 'H' म्हणजे हेल्थ, फिजिकल फिटनेस महत्त्वाचा आहे. केवळ पुस्तकी कीडा न होता क्रीडा, चित्रकला, नाटक व इतर कलागुणांचा वापर करत नवनवीन शिकत राहावे. जगातील बदल स्वीकारा. ग्रामीण भागातले असल्याने कोणताही न्यूनगंड बाळगू नका. कोणतीही अडचण असल्यास ८१४९०३९३८८ यावर संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.

प्रा. डॉ. शेखर राहाणे, पिंपरी-चिंचवड विद्यापीठ

'पुढारी' माध्यम समूहाने बारावीनंतरच्या विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणाची एक प्रकारे संधीच निर्माण करून दिल्याने कृतज्ञता व्यक्त करतो. प्रवेश घेताना विद्यार्थ्यांनी आपला अर्ज व्यवस्थित भरावा, असे सांगितले. कागदपत्रांच्या आधारे विविध शासनमान्य शिष्यवृत्तीचे अर्ज भरताना, ज्या विविध सुविधा दिल्या आहेत त्यातून ते भरावेत. रिकाम्या जागा अचूक व बिनचूक भरा. ऑनलाइन-ऑफलाइन तपासून घ्या. जातीचा उल्लेख, नाव, गुण हे भरणे ही महत्त्वाची प्रक्रिया आणि पहिली पायरी आहे. गुणपत्रिका, जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र, पडताळणी, नॉन-क्रिमिलेअर अशी दहा कागदपत्रे प्रवेशासाठी लागतात.

विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी राज्य सरकार शैक्षणिक योजना राबवत आहे, त्याचा लाभ घ्या. अपेक्षित महाविद्यालय आणि कोर्स यांची सांगड घालणे महत्त्वाचे असून, आपल्याला मिळालेले गुण आणि अपेक्षा याचाही विचार करावा. काय शिकावं, कोणत्या व्यवस्थेत शिकावं हे महत्त्वाचं ध्येय प्रत्येकाने ठेवावे. मार्ग कोणताही असू दे, मी कोणत्या संस्थेत शिकतोय यावर ध्यान ठेवावे, असेही त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT