Exam Paper Pudhari
पुणे

ICSI Amnesty Scheme: ICSI अभय योजना सुरू; कंपनी सचिव अभ्यासक्रम पूर्ण करण्याची पुन्हा संधी

अभ्यासक्रम सोडलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवेशाची संधी; नोंदणी 30 जूनपर्यंत

पुढारी वृत्तसेवा

पुणे: कंपनी सचिव अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊन कोणत्याही टप्प्यावर अभ्यासक्रम सोडलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी 'द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया'ने अभय योजना (ॲम्नेस्टी स्कीम) आणली आहे. या अंतर्गत आतापर्यंत देशभरातील सुमारे एक हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, पुन्हा प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना नोंदणीसाठी ३० जूनपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

'द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया'चे अध्यक्ष (आयसीएसआय) पवन चांडक यांनी ही माहिती दिली. आयसीएसआयतर्फे कंपनी सचिवांसाठी पुण्यात आयोजित केलेल्या २७ व्या राष्ट्रीय परिषदेच्या पार्श्वभूमीवर चांडक यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. कंपनी सचिव हा अभ्यासक्रम बारावीनंतर किंवा पदवीनंतर करता येतो. बारावीनंतर प्रवेश परीक्षा द्यावी लागते, तर पदवीनंतर थेट एक्झिक्युटिव्ह टप्प्यावर प्रवेश मिळतो. परंतु, बारावीनंतर प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण होऊन प्रवेश घेतल्यास दोन वर्षे वाचतात.

या पूर्वीच्या काळात कोणत्याही टप्प्यावर कंपनी सचिव अभ्यासक्रम सोडलेल्या विद्यार्थ्यांना अभय योजनेच्या माध्यमातून नव्याने नोंदणी करून कंपनी सचिव अभ्यासक्रम पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे. ही योजना जानेवारी २०२६ मध्ये सादर करण्यात आली. अभय योजनेद्वारे प्रवेश घेतल्यास ज्या विद्यार्थ्यांना ६० टक्के मिळवल्याने ज्या विषयांत सवलत मिळाली होती, ती सवलतही कायम ठेवली जाणार आहे. जूनअखेरीस विद्यार्थ्यांच्या नोंदणीचा आढावा घेऊन योजना पुढे सुरू ठेवायची की थांबवायची, याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. सध्या अंतिम परीक्षेत उत्तीर्ण होण्याचे प्रमाण १० टक्क्यांपर्यंत आहे, असे चांडक यांनी नमूद केले.

कंपनी सचिव अभ्यासक्रमाचे शुल्कही कमी असल्याने विद्यार्थ्यांनी योग्य पद्धतीने अभ्यास केल्यास सहजपणे कंपनी सचिव होऊन उत्तम करिअर करता येते. कंपनी सचिव अभ्यासक्रम पूर्ण केलेल्यांना व्यावसायिक म्हणून किंवा कंपनीमध्ये नोकरी असे दोन्ही पर्याय उपलब्ध असतात. अनेक कंपनी सचिव काही काळ कंपनीत नोकरी करून कालांतराने स्वतःचा व्यवसाय करण्याकडेही वळतात, असेही पवन चांडक यांनी सांगितले.

देशभरात कंपनी सचिवांना मागणी

देशात मुंबई, पुण्यासह बंगळुरू, हैदराबाद, दिल्ली, अहमदाबाद अशा शहरांमध्ये कंपनी सचिवांची संख्या वाढत आहे. देशभरात एकूण ८० हजार कंपनी सचिव कार्यरत आहेत. त्यापैकी २० हजार स्वतःचा व्यवसाय करणारे कंपनी सचिव आहेत, उर्वरित कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरदार आहेत. उद्योग क्षेत्रातून कंपनी सचिवांची मागणी वाढत असल्याने या क्षेत्रात भरपूर संधी आहेत, असे पवन चांडक यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT