बावडा: इंदापूर तालुक्यात गेल्या तीन महिन्यांपासून वाढत्या उष्णतेचा व तीव उकाड्याचा प्रकोप कायम असल्याचे चित्र मंगळवारी (दि. 19) दिसून आले. सध्याच्या वाढत्या उष्णतेने शेतकरी, शेतमजूर व समाजातील सर्वच घटक त्रस्त झाले आहेत. दिवसा अंगाची लाहीलाही होत असल्याने दुपारच्या सुमारास रस्ते देखील ओस पडू लागले आहेत.
चालू वर्षी अचानकपणे वाढलेली तीव स्वरूपाची उष्णता व वाढलेल्या आद्रतेने उकाड्याची असह्य तीवता दिसून येत आहे. तापमानाने 42 अंश सेल्सिअसचा पारा ओलांडल्याने ज्येष्ठ नागरिक व बालकांना तीव उष्णतेचा सामना करावा लागत आहे. दुपारी रस्त्यांवर गर्दी तुरळक दिसत आहे. वाढत्या उष्णतेमुळे दुपारी बाजारपेठा ओस पडत आहेत, तर दुपारी शेतमजूर शेतात काम करणे बंद करून विश्रांती घेताना दिसत आहेत.
वाढत्या उष्णतेने ऊस पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम झाल्याची माहिती अकलूज येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष सुरेश मेहेर (सुरवड) यांनी दिली. त्याचा परिणाम उसाच्या टनेजमध्ये होऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
वाढत्या उष्णतेने जनावरांच्या दूध देण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला आहे. त्यामळे दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये काळजीचे वातावरण दिसून येत आहे, असे निरा भीमा कारखान्याचे संचालक राजकुमार जाधव (सराफवाडी) यांनी सांगितले.
सध्याच्या वाढत्या उष्णतेने तरुण नागरिक व वृद्धांमध्ये बालकांच्या तुलनेत जास्त अशक्तपणा येणे, चिडचिड करणे व उष्माघाताची लक्षणे वाढत्या उन्हामुळे दिसत आहेत. सध्याच्या वाढत्या तीव उन्हामुळे नागरिक व बालकांनी दुपारी शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे. सायंकाळी घराबाहेर पडावे, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.