यवत: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात पुणे-सोलापूर महामार्गावरील हडपसर ते यवत या मार्गावर सहापदरी उड्डाणपूल उभारण्यासाठी तब्बल 5 हजार 262 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केल्याची घोषणा केली. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे दौंड तालुक्याच्या अर्थकारणात मोठे परिवर्तन घडण्याची घडणार आहे.
पुणे शहरातून दौंड तालुक्यात प्रवेश करण्यासाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. सहापदरी उड्डाणपूल उभारल्यास पुणेकरांना वाहतुकीच्या कोंडीत अडकण्याशिवाय सहज आणि जलदगतीने दौंडमध्ये प्रवेश करता येणार आहे. त्यामुळे औद्योगिक, व्यावसायिक आणि निवासी विकासाला चालना मिळण्याची शक्यता आहे. या प्रकल्पामुळे दौंड तालुक्यातील यवत, केडगाव, भांडगाव, खोर, वरवंड, पाटस या भागांमध्ये गुंतवणूकदारांचा ओढा मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. पुण्याच्या वाढत्या विस्तारामुळे उद्योग, वेअरहाऊसिंग, लॉजिस्टिक पार्क तसेच गृहनिर्माण प्रकल्पांसाठी या परिसराकडे विकासकांचे लक्ष वेधले जाणार आहे
दरम्यान, दौंड तालुक्याच्या पश्चिम भागातील खोर, भांडगाव, वासुंदे, जिरेगाव या जिरायती पट्ट्यालाही आगामी पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाचा मोठा फायदा होणार आहे. महामार्ग, विमानतळ आणि पुण्याशी वाढलेली जोडणी या तिन्ही गोष्टी एकत्र आल्यास या भागाचा चेहरामोहरा आगामी काळात पूर्णपणे बदललेला दिसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. वाहतूक सुलभता, गुंतवणूक आणि औद्योगिक विकास या दृष्टीने पाहता हडपसर-यवत सहापदरी उड्डाणपूल प्रकल्प हा दौंड तालुक्याच्या भविष्यासाठी टर्निंग पॉईंट ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि व्यापारी वर्गामध्ये या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.
पूल भैरोबानाला ते भांडगावपर्यंत करावा
अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या उड्डाणपुलाची लांबी पुणे शहरातील भैरोबानाला ते भांडगाव अशी वाढवल्यास याचा चांगला फायदा या भागातील नागरिकांना आणि भविष्यातील गुंतवणूकदारांना होणार आहे. सद्यस्थितीत यवतमधील वाहतूक समस्या आणि वाढत आहे. नागरीकरण लक्षात घेता हा उड्डाणपूल भांडगावपर्यंत करावा, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.
गेले वर्षभर पुणे-सोलापूर महामार्गावरील सहापदरी उड्डाणपुलासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला. आता अर्थसंकल्पात त्यांनी या प्रकल्पासाठी तरतूद केल्याने पुण्याच्या ग््राामीण भागाच्या विकासाला निश्चितच चालना मिळणार आहे. या निर्णयाबद्दल मी मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार व्यक्त करतो.राहुल कुल, आमदार, दौंड