सुनील माळी
स्थळ: तेच हडपसरचं चहाचं हॉटेल अन् पात्र तीच तुपे, बनकर, लोणकर आणि जगताप... दिवस मात्र दुसरा...
तुपे: आम्हाला राजकारण कळत नाही, असं सांगून काल पळून गेलास ना ? आता सांग, आम्हाला काय कळत नाही राजकारणातलं ? आमच्या काळ्याचे पांढरे झाले नेत्यांच्या मागं धावून अन् प्रचारफेऱ्या काढून... तरीही म्हणतोस आम्हाला राजकारण कळत नाही ? अरे सॉरी..., काल दादांच्या प्रवेशाची गडबड होती, म्हणून लवकर जावं लागलं... आज आता कालचा मुद्दा पुरा करतो... फक्त काळ्याचे पांढरे होईपर्यंत पक्षात काम केलं म्हणजे राजकारण कळलं असं होईल का कधी ?... प्रचारफेऱ्या काढल्या अन् घोषणा दिल्या की झाला कार्यकर्ता शहाणा, असं होतं का ?...
लोणकर: तुला समजतं ना राजकारण ? आम्हाला तिघांनाही कळत नाही. प्रशांतरावांनी असा पक्ष का सोडला काहीही कारण नसताना ? तुला काय वाटतं ते सांग ना ? ऐका मग मला वाटत असलेली कारणं... बघा पटतात का ? हे बघा..., प्रशांतदादा वानवडी भागातून महापालिकेत निवडून जातात..., पण आता त्यांना फक्त नगरसेवकपदाचीच इच्छा नाही उरलेली. आता त्यांना विधानसभा खुणावतेय..., त्यांना आमदार व्हायचंय..., विधानसभेची गेली निवडणूक त्यांनी लढवलीही त्याच महत्त्वाकांक्षेतून... आणि महत्त्वाकांक्षा प्रत्येक राजकीय कार्यकर्त्याला हवीच ना ?... त्यांचा पराभव झाला ती गोष्ट वेगळी,
पण कधी ना कधी हडपसरमधून आमदारकी मिळवण्याचं त्यांचं स्वप्न आहे. आता आमदारकी मिळवायला काय लागतं ? तर विधानसभेची निवडणूक लढवावी लागते. ती निवडणूक जिंकण्यासाठी काय लागतं ? प्रत्येक भागातल्या बहुसंख्य मतदारांचा पाठिंबा लागतो... प्रत्येक भागातून बहुसंख्य मतदारांनी पाठिंबा देण्यासाठी काय लागतं ?... तर त्या प्रत्येक भागात आपल्याला मानणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी लागते.... ही फळी एखाद्या राजकीय पक्षातल्या कार्यकर्त्याला कधी मानू लागते ?... जेव्हा त्या फळीतल्या कार्यकर्त्यांना महापालिकेची उमेदवारी तो प्रमुख कार्यकर्ता देतो आणि निवडूनही आणतो तेव्हा... मग खुळ्यांनो, आता प्रशांतदादांना फक्त महापालिकेचं सभासदत्व नकोय..., तिकीटवाटपाचा अधिकार हवाय...
तुपे: अरे बापरे..., खरंच की रे बनकरा... माझ्या लक्षातच आलं नाही हे... तिकिटं निश्चित करायचा अधिकार असतो आमदाराकडं... अन् दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले की तो अधिकार जाणार आताचे आमदार चेतनदादा तुपेंकडं... मग, प्रशांतदादा आपल्या कार्यकर्त्यांची तिकिटं कशी बसवणार अन् पुढची विधानसभा कशी जिंकणार ?... शाबास रे पठ्ठ्या माझा... आता तुला कळायला लागलंय... अरे, प्रशांतदादांनी निवडणूकच मुळी लढवली चेतनदादांविरोधात..., मग त्याच्या हाताखाली पालिकेच्या इलेक्शनमध्ये दादा कसं काम करणार ?... त्यांनी परवापरवापर्यंत फिल्डिंग व्यवस्थित लावली होती... पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीच्या यंत्रणेची घडी बसवत आणली होती... पुऱ्या शहराच्याच इलेक्शनचं नियोजन त्यांनी केलं होतं..., अर्थात, त्यातही मुख्यत: हडपसरचं नियोजन त्यांनी केलं होतंच..., पण कसंच काय अन् कसंच काय ?... दोन्ही राष्ट्रवादी एक होणार आता... मग कसं होणार प्रशांतदादांचं आमदार होण्याचं स्वप्न पूर्ण ?...
तुपे: बरोबर रे बनकरा..., तुझं ऐकल्यावर आजून एक मुद्दा मला लक्षात येतोय..., काँग््रेासही आता हडपसरमध्ये नव्या पिढीच्या चेहऱ्याच्या शोधात होतीच ना ?... बाळासाहेब शिवरकरांना साथ द्यायला आता नव्या पिढीचं नेतृत्व हडपसरमध्ये द्यायचा त्यांचा प्रयत्न असेल ना ?... म्हणूनच तर प्रशांतदादा काँग््रेासमध्ये गेले... अजितदादांचं नेतृत्व पटलं नाही, असा त्याचा अर्थ नाही... कारण ते जाताना दादा, पवारसाहेब आणि सुप्रियाताई यांच्या नेतृत्वाबाबत तोंड भरून बोलले ना... बरोब्बर..., अरे आताच्या काळात सगळे चाललेत बीजेपीत, काही जण शिंदे सेनेत, पण काँग््रेासमध्ये कोण गेलंय असं ऐकलं का तुम्ही ?... पण प्रशांतदादा गेले त्याला कारण काँग््रेासला येत्या निवडणुकीत खूप आशा आहेत, म्हणून नव्हे तर आपल्या स्वत:च्या नेतृत्वाची पायाभरणी होण्यासाठी...
तुपे: आता पटतंय रे तुझं..., पण एक प्रश्न राहतोच... तू म्हटलास की शिवरकरांना साथ द्यायला प्रशांतदादांना काँग््रेासनं घेतलं, पण मग त्यांच्या प्रवेशाबाबत पार्टीनं बाळासाहेबांना का काही सांगितलं नाही ? त्यांच्यापासून का लपवून ठेवलं ? अन् बाळासाहेबांनी या प्रवेशाला विरोध का केला ? त्यांच्या घरातल्या तिकिटाला तर काही कुणाचा विरोध होणार नाही ना ?... फार प्रश्न विचारतोस बाबा तू अडचणीत आणणारे... सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची नसतात... चल, आता चहा झाला. आता आपल्याला पार्टी ऑफिसमध्ये जायचंय ना ?...