पुणे : पुढारी वृत्तसेवा : अयोध्या येथे उभारण्यात येणार्या प्रभू श्रीराम मंदिर उद्घाटनाच्या आनंद सोहळ्यात गीतरामायणाचा समावेश करावा, अशी मराठी जनांची मागणी असल्याची भावना माडगूळकर कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. श्रीराम मंदिरामध्ये एक कोपरा ग. दि. माडगूळकर आणि सुधीर फडके ऊर्फ बाबूजी यांच्या गीतरामायणासाठी राखीव करावा, अशी अपेक्षा गदिमांचे नातू सुमित्र माडगूळकर यांनी बोलून दाखविली.
केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी मनातले गीतरामायणाचे महत्त्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवायला हवे. अयोध्येतील श्रीराममंदिरात एक कोपरा तरी गीतरामायण आणि गदिमा – बाबुजी यांच्यासाठी राखीव हवा असे मनापासून वाटते, असे सुमित्र माडगूळकर यांनी पत्रकाद्वारे सांगितले.
महाराष्ट्राबाहेरही गीतरामायण पोहोचले पाहिजे. 22 जानेवारी रोजी होणार्या आनंद सोहळ्यात गीतरामायणाचा समावेश झाला तर यासारखा परमोच्च आनंद दुसरा नाही. मुख्यतः श्रीराम मंदिरात एक छोटी गीतरामायणाचे महत्त्व सांगणारी जागा हवी. गीतरामायणाचे अनेक भाषांत रूपांतर झाले आहे. त्यामुळे गीतरामायण आता महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता भारतमय व्हावे अशी भावना सुमित्र माडगूळकर यांनी व्यक्त केली.
हेही वाचा