पुणे

पुणे जिल्ह्यात पाच वर्षात बालमृत्यूचे प्रमाण घटले

अमृता चौगुले

समीर सय्यद

पुणे : ग्रामीण भागात बाल व मातामृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी राबविण्यात येणार्‍या विविध योजनांचा परिणाम आता होऊ लागला असून, गेल्या पाच वर्षांत या मृत्यूंचे प्रमाण घटत असल्याचे आढळून आले आहे.

पुणे जिल्ह्यात पाच वर्षांत 1 हजार 364 बालकांचा मृत्यू झाला; तसेच 51 मातांचाही मृत्यू झाला आहे. मात्र, पाच वर्षांची आकडेवारी पाहता त्यात घट होत आहे. ग्रामीण भागात बाल व माता मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या वतीने विविध आरोग्यविषयक कार्यक्रम राबविले जात असल्याने गेल्या पाच वर्षांत तुलनेने बालमृत्यूंचे प्रमाण कमी होत गेले आहे.

ग्रामीण भागाच्या तुलनेत शहराच्या लगत असलेल्या हवेली तालुक्यात सर्वाधिक बालकांचा मृत्यू झाला आहे. 2017-18 या आर्थिक वर्षात 317 बालकांचा मृत्यू झाला असून, त्यात एक वर्षाच्या आतील 253, तर दीड वर्षाच्या आतील 53 बालकांचा समावेश आहे. 2018-19 या वर्षात बालमृत्यूत वाढ झाली असून, वर्षात 322 बालकांचा मृत्यू झाला आहे. त्यात एक वर्षाच्या आतील 267, तर दीड वर्षाच्या आतील 55 बालकांचा समावेश आहे. सन 2019-20 वर्षात घट झाली असून, 251 बालकांपैकी एक वर्षाच्या आतील 226, तर दीड वर्षाच्या आतील 25 बालके आहेत.

पाच वर्षांत बालमृत्यूचे प्रमाण कमी होत असले, तरी ते अपेक्षेप्रमाणे कमी झालेले नाही. सन 2020-21 मध्ये 247 बालके मृत्युमुखी पडली. त्यात 196 एक वर्षाच्या आतील आणि 51 मुले दीड वर्षाखालील आहेत. फेब्रुवारी 2022 अखेरपर्यंत मृत्यूत घट झाली असून, 227 बालकांचा मृत्यू झाला आहे. त्यात एक वर्षाआतील 169, तर 58 मुले दीड वर्षाच्या आतील आहेत.

हवेलीत सर्वाधिक मृत्यू

जिल्ह्यातील सर्व तेरा तालुक्यांमध्ये बालकांच्या मृत्यूची नोंद आहे. त्यात सर्वाधिक हवेली तालुक्यात तब्बल 503 बालकांचे मृत्यू झाले, तर सर्वात कमी मुळशी आणि वेल्ह्यात प्रत्येकी 21 बालकांचा समावेश आहे. आंबेगाव 86, बारामती 112, भोर 53, दौंड 82, इंदापूर 75, जुन्नर 101, खेड 153, मावळ 21, पुरंदर 65, शिरूर तालुक्यात गेल्या पाच वर्षांत 61 बालकांच्या मृत्यूची नोंद
झाली आहे.

माता व बालमृत्यू रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून राबविण्यात येणा-या अभियानाच्या माध्यमातून आरोग्य विभाग सातत्याने प्रयत्न करीत आहे. बालकांच्या मृत्यूच्या प्रमाणात घट झाली असली, तरी मृत्यूच होऊ नयेत, यासाठी आमचे प्रयत्न असतात. जिल्ह्यात 51 मातांचेही मृत्यू झाले. या सर्वांचे वैद्यकीय विश्लेषण करून मृत्यूचे कारण शोधण्यात आले आहे. त्यात प्रसूतीवेळी उद्भवलेल्या गुंतागुंतींमुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

                             – डॉ. भगवान पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT