ओतूर: कल्याण–अहिल्यानगर महामार्गावर डिंगोरे (ता. जुन्नर) गावच्या हद्दीत हॉटेल जीवनदीप समोर रविवारी (दि. २४) रात्री ८ ते ९ वाजेच्या भीषण अपघात झाला. या अपघातात चार दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला.
हे चारही युवक डिंगोरे (ता. जुन्नर ) येथील आहेत. त्यांची नावे आशिष ढवळू भले, दीपक सखाराम भले (दोघेही रा. मराडवाडी डिंगोरे), शिवराम नारायण पारधी आणि खंडू नारायण भले (दोघेही रा. आंबेदरा, डिंगोरे, ता. जुन्नर) अशी आहेत.
कल्याणहून ओतूरच्या दिशेने येणाऱ्या विठ्ठलवाडी-पाथर्डी या एसटी बसने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा दुर्दैवी अपघात घडल्याची माहिती ओतूर पोलिस सूत्रांनी दिली. तर प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, एसटी बस चालकाने महामार्गावर भरधाव वेगात बस चालवत पुढील वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी बस चालकाने पूर्णपणे डावी लेन सोडून उजव्या बाजूच्या लेनमध्ये प्रवेश केल्याने समोरून येणाऱ्या दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील चारही जणांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातानंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून ग्रामस्थांनी एसटी बसचालकाच्या बेदरकार वृत्तीवर संताप व्यक्त केला आहे. निष्काळजीपणे व वेगाने वाहन चालवल्यामुळे निष्पाप चार जणांना जीव गमवावा लागल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.