पुणे : पुढारी वृत्तसेवा : कोरेगाव भीमा येथे शौर्य दिनानिमित्त अनुयायांना बार्टीच्या वतीने दरवर्षी भोजन देण्यात येते. मात्र, सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर झालेली टीका तसेच भीम आर्मी संघटनेने दिलेल्या पत्रामुळे भोजन पुरवठ्याची ई- निविदा रद्द करण्याचे आदेश बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी प्रकाशन व प्रसिध्दी विभागास बुधवारी दिले. दरम्यान, कोरेगाव भीमा येथे येणा-या लाखो अनुयायांसाठी काही किलोमीटरच्या परिसरात भोजन करण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्याने हाल होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे भोजनाची व्यवस्था होणे गरजेचे आहे, असे काही संघटनांनी म्हटले आहे. शौर्य दिनानिमित्त कोरेगाव भीमा येथे लाखो अनुयायी येतात. त्यांना बार्टीच्या वतीने भोजन देण्यात येते. त्यासाठी ई-निविदा काढण्यात आल्या होत्या. मात्र, सोशल मीडियावर होत असलेली टीका तसेच भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी दिलेले पत्र ही बाब लक्षात घेऊन ही ई-निविदा रद्द करण्यात आली आहे.
विजयस्तंभस्थळी अभिवादन करण्यासाठी येणार्या अनुयायांसाठी विविध सुविधा कोरेगाव भीमा येथे करण्यास सुरुवात झाली आहे. दोन हजार शौचालयांची उभारणी करण्यात येणार आहे, गेल्या वर्षी ही संख्या दीड हजार एवढी होती. तर हिरकणी कक्ष एकवरून तीनपेक्षा अधिक करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाकडून देण्यात आली.
विविध विभागांना विभागून दिलेली कामे त्यांचे अधिकारी स्थळ पाहणी करून कामे निश्चित केली जात आहेत. स्वच्छता, पाणी, आरोग्य सुविधेमध्ये नागरिकांची कुठलीही गैरसोय होणार नाही, याबाबत प्रशासन काळजी घेत आहे. पिण्याच्या पाण्याच्या टँकरमध्ये वाढ करून 130 एवढी करण्यात येणार आहे. हिरकणी कक्ष हा कार्यक्रमस्थळी असणारच आहे, त्याशिवाय वाहनतळावर हिरकणी कक्षाची व्यवस्था करण्यात येणार आहे.
हिरकणी कक्षामध्ये महिलांना आवश्यक योग्य व्यवस्था करण्यात येणार असून, या वर्षी सुरक्षिततेसाठी पोलिसाचीदेखील नियुक्ती हिरकणी कक्षाच्या ठिकाणी केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. आरोग्य विभागाकडून 19 ठिकाणी ओपीडी सुरू ठेवली जाणार आहे. शिवाय, मोबाईल क्लिनिकची संख्या ही 19 असणार आहे. त्याचबरोबर परिसरातील खासगी रुग्णालयातील शंभर खाटा आरक्षित करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
हेही वाचा